
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. अशाच एका भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. ही रक्कम कशासाठी आणि कुठून आली याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
निवडणूक भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. ही रोकड ATM मध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या रकमेबाबत संशय असल्यामुळे या पैशांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाकजे सोपवण्यात आला आहे. सध्या ही रोकड देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आली असून ही रोकड कुठून कुठे नेली जात होती याची माहिती घेतली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या रकमेबाबत संशय आहे. सध्या निवडणूक असल्यामुळे पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. यावर बारीक नजर ठेवली जात आहे. संशयित वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. अशाच एका कारवाईत ही रक्कम आढळली आहे. या पैशांची पुढील चौकशी आयकर विभाग करत आहे. देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीत केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
मुंबईसह राज्याच्या विविध भागात सध्या भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहे. तसेच प्रमुख शहरांच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी करण्यात आली असून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. याचे कारण म्हणजे मतदानाच्या आणि प्रचाराच्या काळात राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होण्याची शक्यता आहे. मतदारांना पैशांचे आमिष दाखवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून अशा गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.