BMC Mayor : अखेर मुंबईत महापौरराज, रितू तावडे यांनी स्वीकारला पदभार; नव्या नियमाने प्रक्रिया कशी पार पडली?
मुंबईला अखेर महापौर मिळाला आहे! भाजपच्या रितू तावडे यांनी मुंबई महापौरपदाची सूत्रे स्वीकारली, तर संजय घाडी उपमहापौर बनले. यामुळे प्रशासक राज संपुष्टात येऊन महापौरराज सुरु झाले आहे. विरोधात उमेदवार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. महापौर निवडीसाठी नव्या नियमानुसार पालिका आयुक्तांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले, ज्यामुळे प्रक्रियेत बदल दिसून आला.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबईला आज अखेर महापौर मिळाला आहे. भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. आज त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हातून पदभार स्वीकारला. त्यामुळे मुंबईतील प्रशासक राज संपुष्टात आले असून आता मुंबईत मेयर राज सुरू झालं आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीने महापौरपदाचं बहुमत मिळवलं होतं. त्यामुळे भाजपचा महापौर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर भाजपने रितू तावडे यांची भाजपचे महापौरपदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले तर शिंदे सेनेने संजय घाडी यांचे उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले. मात्र, संख्याबळा अभावी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही. त्यामुळे या निवडणुकीत विरोधात एकही अर्ज आला नसल्याने तावडे आणि घाडी यांची बिनविरोध निवड झाली. आज या दोघांनीही औपचारिकपणे महापौरपदाची सूत्रे स्वीकारली.
भाजपच्या दुसऱ्या मेयर
या निवडीनंतर रितू तावडे या भाजपच्या मुंबईच्या दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी 1982 मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे मुंबईचे पहिले महापौर झाले होते. त्यानंतर रितू तावडे यांना भाजपच्या दुसऱ्या महापौर बनण्याचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर बनण्याचा मानही तावडे यांना मिळाला आहे. रितू तावडे या घाटकोपरच्या नगरसेविका आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिलं होतं. त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं होतं.
ठाकरेंची सत्ता गेली…
राज्यातील सत्ता गमवावी लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ताही गेली आहे. मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची अडीच दशकाहून अधिक काळ म्हणजे 24 वर्षाहून अधिककाळ निर्विवाद सत्ता होती. या काळात ठाकरे गटाने अनेक चांगली कामे केली होती. मात्र, यावेळी त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे.
नव्या नियमानुसार कशी झाली प्रक्रिया?
नवीन नियमानुसार पिठासीन अधिकारी म्हणून आयुक्त भूषण गगराणी विराजमान झाले. या अगोदर ज्येष्ठ सदस्य महापौर निवडणुकीवेळी कार्यभार स्वीकारायचे. यावरून ठाकरेंची सेना आक्षेप घेतला. नव्या महापौर निवडीवेळी पीठासीन अधिकारी कोण असावा? याचा नियम सरकारने अधिसूचनेद्वारे बदलला आहे. आधीच्या नियमानुसार मावळते महापौर किंवा सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी असायचे. नव्या अधिसूचनेनुसार महापौर निवडीचे अधिकार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. सध्याचे आयुक्त भूषण गगराणी यांचा दर्जा प्रधान सचिवाचा असल्याने तेच पीठासीन अधिकारी आहेत.
मागील पालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून जवळपास तीन वर्षे झाल्याने ‘मावळते महापौर’ ही संकल्पना लागू होत नाही. जुन्या नियमानुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी होण्याचा अधिकार होता. हा अधिकार काढून तो थेट प्रशासकीय अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संभाव्य तिढा टाळण्यासाठी नियम बदलल्याची चर्चा आहे. पीठासीन अधिकारी विरोधी पक्षाचा असता, तर सत्ताधाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या असत्या अशा चर्चा आहेत. नव्या नियमावरून महापौर निवडीच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी–विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
फडणवीस आले, प्रचंड घोषणाबाजी… बीएमसी हेडक्वार्टर बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापौर – उपमहापौर नियुक्ती दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनपात दाखल झाले. मात्र ते येताच जोरदार घोषणाबाजीला सुरूवात झाली. भारतीय जनता पक्षाकडून देवाभाऊ, देवाभाऊ अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र त्या ऐकतचा शिवसेना ठाकरे गटाकडूनही घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरेंकडून, चोर है चोर है, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच प्रचंड गोंधळ सुरू झाला. थोड्यावेळाने वातावरण निवळले, पण काही वेळाने भाजपकडून पुन्हा मोदींच्या नावाने मोदी घोषणा देण्यात आल्या. ते ऐकल्यालवर ठाकरेंचे नगरसेवक पुन्हा आक्रमक झाले आणि त्यांनी चोर है , चोर है च्या घोषणांनी सभागृह दणाणून टाकलं. त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं.
