निवडणूक जिंकून न आलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, कारण… अजित पवार यांचा थेट हल्ला

ajit pawar interview: मी १९९१ मध्ये राजकारणात आलो. देवेंद्र फडणवीस १९९९ मध्ये तर एकनाथ शिंदे २००४ मध्ये राजकारणात आले. हे लोक मुख्यमंत्री बनले. हे मी हसतहसत बोललो. तसेच निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री बनले.

निवडणूक जिंकून न आलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, कारण... अजित पवार यांचा थेट हल्ला
Ajit pawar
| Updated on: Aug 15, 2024 | 5:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदावरुन अजित पवार यांनी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. निवडणूक न लढवता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कारण त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होतो. तसेच नशीबाचा भाग असतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस पुढे गेले…

राज्यात मुख्यमंत्रीपदाची संधी कनिष्ठ असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मिळाली. परंतु आपणास मिळाली नाही, या वक्तव्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम राजकीय कार्यक्रम नव्हता. त्यावेळी मी १९९१ मध्ये राजकारणात आलो. देवेंद्र फडणवीस १९९९ मध्ये तर एकनाथ शिंदे २००४ मध्ये राजकारणात आले. हे लोक मुख्यमंत्री बनले. हे मी हसतहसत बोललो. तसेच निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री बनले. कारण त्यांच्याकडे आकडा होता.

राज्यात कुणालाही मुख्यमंत्री बनायचे असेल तर त्यांच्याकडे आकडा पाहिजे. तसेच हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. आजपर्यंत त्यांनी जे काम केले तोही भाग आहे. पृथ्वीराज चव्हाण खासदार होते. केंद्रात मंत्री होते. तरीही ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते एमएलसी बनले. उद्धव ठाकरेही आधी मुख्यमंत्री बनले. नंतर एमएलसी बनले. असेही कधी कधी होते असते.

विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळणार

आधी महायुती म्हणून पहिल्यांदा आम्ही विधानसभा लढत आहोत. आम्हाला बहुमत मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मतदारांशी संपर्क साधत आहोत. त्यांना आम्ही केलेली कामे दाखवून देत आहोत. नुकतीच जळगावमध्ये आमचा मोठा कार्यक्रम झाला. केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार होते. आम्ही आमचं काम सुरू केलं आहे. विरोधकांनीही त्यांचे काम सुरू केले आहे. राज्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि आमचा पक्ष यांच्यात स्पर्धा नाही. जयंत पाटील, अमोल कोल्हे यांना जे वाटतं ते करत आहेत. त्यांच्या हिशोबाने ते पुढे जात आहे. आमच्या हिशोबाने आम्ही पुढे जात आहोत.