वांद्र्यात दोन दिवसानंतर मोठ्या घडामोडी घडणार? पोलीस हाय अलर्टवर; कारवाईचा चौथा दिवस
वांद्रे येथील गरीब नवाज नगरमध्ये अनधिकृत झोपड्यांवरील तोडक कारवाईचा आज चौथा दिवस आहे, 90% काम पूर्ण झाले आहे. जुम्माच्या नमाजमुळे पोलीस हाय अलर्टवर असून, मोठ्या घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुलभ केली जाईल.

वांद्र्याच्या गरीब नवाज नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर आजही कारवाई करण्यात येणार आहे. आज तोडक कारवाईचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत तीन दिवसात 90 टक्के झोपड्या पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ 10 टक्के तोडक कारवाईचं काम बाकी आहे. मात्र, आज नमाजचा दिवस असल्याने पोलीस हायअलर्टवर आले आहेत. आजच्या तोडक कारवाई दरम्यान गरीब नवाजमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच या कारवाई दरम्यान उपद्रवींवर लक्ष ठेवलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांद्रा स्टेशन बाहेरच्या गरीब नगर येथील तोडक कारवाईबाबत बांद्र्यातील मशिदींवर मुंबई पोलिसांचं आज विशेष लक्ष आहे. शुक्रवारच्या नमाज नंतर मोठ्या घडामोडीची शक्यता आहे. दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत पोलिसांनी वर्तवले आहेत. दोन दिवसात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने पोलीस हायअलर्टवर आहेत. या तोडक कारवाईवर स्थानिक आमदार आणि खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कारवाईचा चौथा दिवस
गरीब नगरमध्ये रेल्वेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा आज चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं पाडकाम जवळपास अंतिम टप्प्यात आलंय. 90 टक्के काम पूर्ण झालंय. पण आज शुक्रवार, जुम्माचा दिवस आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क आहे.
रस्ता मोकळा केला जाणार
दरम्यान, पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. गरीब नगरमधील झोपड्या हटवल्यानंतर मोकळ्या जागेवर वाहतुकीसाठी विकास केला जाणार आहे. वांद्रे पूर्व येथील वाहतुकीच्या दोन तक्रारींचे निवारण केले जाईल. या परिसरातून टर्मिनलकडे जाणारा मार्ग मोकळा केला जाईल.100 घरे पाडली जाणार नाहीत. फक्त तळमजल्यापर्यंतच घरे पाडली जातील. तसेच अतिक्रमण हटवले जाणार आहे, असं विनीत अभिषेक यांनी सांगितलं.
पेव्हर ब्लॉकने हल्ला
दरम्यान, वांद्रे गरीब नगर दगडफेक प्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक केली आहे. हिंसाचारादरम्यान पेव्हर ब्लॉकने पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा या आरोपीवर आरोप आहे. सद्दाम अन्सारी असं या हल्ला करणाऱ्या संशयिताचं नाव आहे. त्याला उद्या वांद्रे न्यायालयात रिमंडसाठी हजर केले जाईल. यापूर्वी आज 15 आरोपीना कोर्टानं 26 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
