बारामती विमान अपघातानंतर माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मुलीच्या निधनानंतर आईची मृत्यूशी झुंज
बारामती विमान अपघातात मुलगी गमावलेल्या माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादरच्या रुग्णालयात आईची मृत्यूशी झुंज सुरू असून, उपचारांच्या खर्चासाठी वडिलांनी मदतीची आर्त हाक दिली आहे.

महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात आपली तरुण मुलगी गमावल्यानंतर आता मुंबईतील माळी कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. पिंकी माळी यांच्या मातोश्रींची रुग्णालयात झुंज सुरु आहे. यामुळे सध्या माळी कुटुंबिय हे सध्या मोठ्या संकटात सापडले आहे.
पिंकी माळी यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु
बारामती विमान अपघातात पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा पिंकी माळी यांच्या आई माया माळी यांना जबरदस्त धक्का बसला. मुलीच्या जाण्याने त्या कोलमडून गेल्या. गेल्या महिन्याभरापासून माय माळी या सतत रडत आहे. त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना उपचारासाठी दादर येथील शुश्रूषा सिटीझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लिमिटेड (Shushrusha Citizens’ Co-operative Hospital Limited) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुलीला गमावल्यानंतर आता पत्नीला वाचवण्यासाठी धडपड
पिंकी माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारच बेताची आहे. पिंकीचे वडील टॅक्सीचालक म्हणून काम करतात. गेल्या ६ दिवसांपासून माया माळी यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारांचा खर्च लाखांच्या घरात असल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आपल्या मुलीला गमावल्यानंतर आता पत्नीला वाचवण्यासाठी तिचे वडील धावपळ करत आहेत.
माळी कुटुंबावर मोठा आघात
पिंकी माळीच्या वडिलांना पैसे कुठून उभे करायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांनी आता मित्रपरिवाराकडे आणि विविध समाजसंस्थांकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी आणि पत्नीवर योग्य उपचार होण्यासाठी त्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. आपल्या लाडक्या मुलीला गमावल्यानंतर हंबरडा फोडत वडिलांनी, “मुलगी गेली, आता पत्नीला वाचवा” अशी आर्त हाक दिली आहे. यामुळे सध्या संपूर्ण माळी कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे बोललं जात आहे.
