राज्यात मोठं काही घडणार? ऑपरेशन टायगर होणार का? उदय सामंत पहिल्यांदाच म्हणाले, लवकरच…
राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. 'ऑपरेशन टायगर' संदर्भात विचारले असता, त्यांनी लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल असे सूचक विधान केले. यामुळे सत्ताधारी पक्षात इनकमिंगची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात लवकरच मोठं काही घडण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी यावर आज पहिल्यांदाच सूचक विधान केलं आहे. राज्यात ऑपरेशन टायगर होण्याच्या चर्चा सुरू असतानाच सामंत यांना त्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर सामंत यांनी लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल, असं थेट विधान केलं आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ऑपरेशन टायगरमध्ये खासदार असणार की आमदार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना ऑपरेशन टायगर होणार का? असा थेट सवाल करण्यात आला. सामंत यांनी त्यावर एका वाक्यात उत्तर दिलं. ऑपरेशन टायगर हे सांगून होत नाही. झाल्यावर ब्रेकिंग न्यूज मिळत असते. तशी ब्रेकिंग न्यूज मिळण्याची शक्यता आहे, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे.
हे दुर्देव आहे
उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. त्यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे दुर्देव आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मोठ्या कष्टाने शिवसेना सुरू केली. काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेबांनी शिवसेना सुरू केली होती. पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मांडीवर धनुष्यबाण ठेवलं. आम्ही उठाव करून धनुष्यबाण ताब्यात घेतला. आता ते धनुष्यबाण गोठवण्याची भाषा करत आहेत, असा हल्ला सामंत यांनी चढवला.
संभाजीनगरला रवाना
दरम्यान, उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे आज छत्रपती संभाजी नगरला जात आहे. संभाजी नगरला जाऊन ते मराठा आरक्षणासंदर्भातील आढावा घेणार आहे. मनोज जरांगे यांच्या ज्या ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत आली? कोणत्या गोष्टी अडल्या आणि कोणत्या नाही याची माहिती घेण्यासाठी सामंत आणि लाड संभाजीनगरला जात आहेत.
जरांगेंनी उपोषण सोडावं
दरम्यान, प्रसाद लाड यांनीही जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्या आहेत. आम्ही खोटं बोलून काम करत नाही. काल रात्री आमचं जरांगेंशी बोलणं झालं. ४५ मिनिटं त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. जरांगे समाजासाठी लढत आहेत. ते तोडग्याची भूमिका घेतील याची आशा आहे. त्यांची आम्ही मनधरणी करतच आहोत. एखादा कार्यकर्ता संघर्ष करतो. तेव्हा त्याला अधिकाराने दिलं पाहिजे, ही भावना आहे, असं प्रसाद लाड म्हणाले. आम्ही आढावा घेण्यासाठी जात आहोत. जरांगे लवकरच निर्णय घेतील अशी खात्री आहे. जरांगेंनी भेटायला बोलावलं तर निश्चित भेट घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
