मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; आता लोकलमधील गर्दीचा त्रास होणार कमी
मध्य रेल्वेने दादर स्थानकात १५ डब्यांच्या लोकलसाठी स्वतंत्र उपमार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या वाढून प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमवीर आता मध्य रेल्वेने आपल्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी लक्षात घेता, प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दादर स्थानकामध्ये १५ डब्यांच्या उपनगरी रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी आता स्वतंत्र उपमार्गिका (स्टेबलिंग लाइन्स) उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या मध्य रेल्वेवर १२ डब्यांच्या गाड्या आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी अनेक प्रवाशांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणे आवश्यक होते. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या गाड्या ठेवण्यासाठी सीएसएमटी फलाट क्रमांक ७ आणि कल्याण येथील मालगाडी यार्डचा वापर केला जातो. मात्र, जागा मर्यादित असल्याने १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाले होते.
मात्र आता दादर स्थानकात नवीन उपमार्गिका तयार केली जाणार आहे. त्यामुळे लोकल गाड्या उभ्या करण्याची अडचण दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला गाड्यांचे वेळापत्रक अधिक प्रभावीपणे सांभाळता येईल आणि देखभालीचे कामही सुलभ होईल.
मध्य रेल्वेकडून ३४ फलाटांचे विस्तारीकरण
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत १५ डब्यांची एक नवीन उपनगरी रेल्वेगाडी रेल्वे ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे एकूण तीन गाड्यांच्या माध्यमातून १५ डब्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल. सध्या मध्य रेल्वेवर दररोज १,८२० उपनगरीय फेऱ्या चालवल्या जातात. ज्यामध्ये सध्या १५ डब्यांच्या ११ अप आणि ११ डाऊन अशा एकूण २२ फेऱ्यांचा समावेश आहे. नवीन गाडी दाखल झाल्यानंतर हा आकडा लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.
तसेच सध्या १५ डब्यांच्या गाड्या सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धावतात, मात्र मार्गावरील अनेक स्थानकांचे फलाट केवळ १२ डब्यांच्या गाड्यांसाठी अनुकूल आहेत. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने ३४ फलाटांच्या विस्तारीकरणाचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत कोपर, शहाड, मुंब्रा, कळवा, ठाकुर्ली, आंबिवली, टिटवाळा, वासिंद, आसनगाव, आटगाव, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शेलू, भिवपुरी, कर्जत, खोपोली आणि पळसदरी या स्थानकांचा समावेश आहे. या सर्व स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवल्यामुळे प्रवाशांना गाड्यांमध्ये चढणे आणि उतरणे सोपे होणार आहे.
प्रवाशांना होणारा फायदा
मुंबई लोकलवर मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या गाड्यांमुळे एकाच वेळी अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, परिणामी गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. नवीन उपमार्गिकेमुळे तांत्रिक अडचणी कमी होऊन गाड्या वेळेवर धावण्यास मदत होईल. तसेच फलाटांच्या विस्तारीकरणामुळे गाड्यांमध्ये चढताना आणि उतरताना होणारी जीवघेणी कसरत टळणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाचा हा प्रयत्न मुंबईकरांच्या प्रवासाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पांमुळे उपनगरी रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम आणि प्रवाशाभिमुख होणार आहे.
