IMD Monsoon Update : मान्सूनसाठी पोषक वातावरण, महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान विभागने दिली गुड न्यूज
मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण असून, मान्सूनची पुढील वाटचाल अतिशय वेगात होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

यंदा देशामध्ये मान्सूनचं आगमन विलंबाने झालं आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून, पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सूनची वाटचाल अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनसाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत मान्सून संपूर्ण केरळ व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून कर्नाटक किनारपट्टीमार्गे उत्तरेकडे सरकरणार आहे. मान्सून गोव्याच्या सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 10 जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
मात्र चिंता वाढवणारी बातमी म्हणजे 10 जून पर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यासाठी 20 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा अंदाज हवामान विभाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असं देखील हवामान विभागानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईमध्ये समिश्र वातावरण पहायला मिळणार आहे, काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी कडक ऊन असणार आहे. तसेच हवेतील आद्रता देखील वाढणार आहे. उद्या मुंबईमध्ये पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
5 आणि 6 जून रोजी कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि डहाणू परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणारे पश्चिमेकडील वारे सक्रिय झाल्यामुळे वातावरणात मोठे बदल होणार आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांचे डोळे सध्या मान्सूच्या वाटेवर लागले आहेत.