टीका करणं सोपं, पण उद्धव ठाकरे होणं अवघड; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना सणसणीत प्रत्युत्तर
एकीकडे मृत्यू आणि दुसरीकडे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न, असा कैचीत मुख्यमंत्री सापडले आहेत. | Jitendra Awhad Uddhav Thackeray
मुंबई: सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळत आहेत. कोरोना परिस्थितीवरून टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होणं, हे अवघड आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. (NCP Leader Jitendra Awhad slams BJP Devendra Fadnavis)
जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भक्कमपणे पाठराखण केली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळत आहेत. एकीकडे मृत्यू आणि दुसरीकडे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न, असा कैचीत मुख्यमंत्री सापडले आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे शांतपणे पर्याय मांडत आहेत. मात्र, विरोधक अशा परिस्थितीमध्येही मदत करण्याऐवजी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना आता टाळ्या वाजवण्याशिवाय काय काम उरलं आहे. सरकार आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधक करतात. पण आता विरोधकांना दाबायला वेळ कुठे आहे. तुम्हाला दाबायचे का कोरोनाला दाबायचे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
20 लाख कोटींचा दिंडोरा पिटता, महाराष्ट्राला काय मिळाले?
जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी 20 लाख कोटींचे पॅकेज दिले, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी सणसणीत भाषेत प्रत्युत्तर दिले.
तुम्ही सारखा 20 लाख कोटी दिले, असा दिंडोरा काय पिटता? यापैकी किती पैसे महाराष्ट्राला मिळाले, हे प्रथम भाजप नेत्यांनी सांगावे. त्यानंतर मला विस्मरणाचा रोग झाला, असे बोलावे. विरोधक हे केवळ कांगावा करण्यात हुशार आहेत, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत.. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2021
‘पत्नी रुग्णालयात, मुलाचा कोरोनाशी लढा, तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय’
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे.
संबंधित बातम्या:
आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंनंतर वर्षा बंगल्यावर आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोना
(NCP Leader Jitendra Awhad slams BJP Devendra Fadnavis)