
Satyacha Morcha 1 November : महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधक उद्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सत्याच्या महामोर्चाच्या तयारीला लागले आहेत. उद्या मुंबईत विरोधकांचे विराट रुप दिसेल. पण त्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. एका जुन्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे समोर येत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या..
आयोगाने बजावली नोटीस
2018 मध्ये कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गुरुवारी याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ठाकरे यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्याविषयी प्रतिसाद न दिल्याने आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रकाश आंबेडकरांचा अर्ज
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि या प्रकरणातील साक्षीदार प्रकाश आंबेडकर यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्ज दाखल केला होता. त्यात ठाकरे यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सादर केलेली कागदपत्रे, आयोगासमोर आणावीत असे निर्देश देण्याची विनंती या अर्जाद्वारे केली होती. काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा आणि नेत्यांचा कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंध असल्याचे त्या कागदपत्रात नमुद असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यानंतर आयोगाने याप्रकरणी पुढील प्रक्रिया केली होती. पण त्याला उद्धव ठाकरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
दोन नोटिशींना कोणताही प्रतिसाद नाही
12 सप्टेंबर आणि 27 ऑक्टोबर रोजी बाजू मांडण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना दोनदा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंबेडकर यांच्या वकिलांनी एक अर्ज दाखल करून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जामीन वॉरंट बजावण्याची विनंती केली होती. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील या चौकशी आयोगाने ठाकरेंना नोटीस बजावली. त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या जामीनपात्र वॉरंट जारी करण्याच्या विनंतीवर अंमलबजावणी का करु नये, अशी विचारणा केली आहे.