Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा नेत्यांचा निर्धार, दादांनी टोचले कान
धनंजय मुंडे, भुजबळांच्या या निर्धारानंतर पुन्हा एकदा अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा रुंगू लागल्यायत. पुण्यातील अजित पवार गटाच्या मेळाव्यात अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार प्रमुख नेत्यांनी केलाय. त्यानंतर अजित पवार पाहा काय म्हणाले...

मुंबई : अजित पवारांना 2024मध्ये मुख्यमंत्री करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलाय. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी जबाबदारी पार पाडण्याचं आवाहनही धनंजय मुंडे, भुजबळांनी कार्यकर्त्यांना केलंय. दरम्यान यानंतर अजितदादांनी जरा कळ सोसा म्हणत आपल्याच नेत्यांचे कान टोचले. पाहुयात याच संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट.
पाहा व्हिडीओ:-
धनंजय मुंडे, भुजबळांच्या या निर्धारानंतर पुन्हा एकदा अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा रुंगू लागल्यायत. पुण्यातील अजित पवार गटाच्या मेळाव्यात अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार प्रमुख नेत्यांनी केलाय. 1999 आणि 2004 मध्ये जास्त जागा येऊनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही? असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी खंत व्यक्त केली. दरम्यान जरा कळ सोसा सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका असा सल्लाही अजित पवारांनी आपल्याच नेत्यांना दिलाय.
अजित पवारांनी जरी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री न करण्याचा सल्ला आपल्या नेत्यांना दिलाय. तरी अजित पवारांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये. अजित पवार गटाच्या नेत्यांनी केलेल्या निर्धारानंतर महायुतीतील इतर नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्री ठरवून घेतलाय. 2024मध्ये देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार लाखनीच्या एका कार्यक्रमात बावनकुळेंनी केला होता. तर 2024 मध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीही केला होता.
एकीकडे छगन भुजबळ अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी जनतेला आवाहन करताय. तर दुसरीकडे ओबीसी मेळाव्यांमध्ये ओबीसी नेत्यांनीही भुजबळांना मुख्यमंत्री करण्याचं बोलून दाखवलंय. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे का? असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. मात्र, येणाऱ्या विधानसभेत जनतेचा कौल कोणत्या पक्षाला मिळतो.. आणि कोण राज्याचा कारभारी होतो हे येणारा काळाच सांगेल.
