हिमालयाच्या मदतीला पुन्हा सह्याद्री धावला… एक आवाहन अन् राज्यात या ठिकाणी नो व्हेईकल
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी इंधन बचत, परदेश दौरे टाळणे आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. याला महाराष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अनेक ठिकाणी 'नो व्हेईकल डे' पाळला जात आहे.

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. इंधनाची बचत करा, परदेश दौरे टाळा अन् वर्षभर सोनं खरेदी करू नका, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. नागरिकांनी मेट्रो, बस सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला राज्याने पुन्हा एकदा प्रतिसाद दिला आहे. हिमालयाच्या मदतीसाठी पुन्हा एकदा सह्याद्री धावून गेला आहे. इंधन बचत करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी नो व्हेईकल डे पाळण्यात येत आहे. तर अनेक नेत्यांनी स्वत:हून इंधनावर चालणाऱ्या गाड्या वापरणं बंद केलं आहे. अनेक नेत्यांनी परदेश दौरेही रद्द केले आहेत. जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी राज्यात मोठे प्रयत्न सुरू आहेत.
परभणीत रविवारी नो व्हेईकल डे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आवाहन केल्या नंतर अनेक स्तरावरून या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या जनतेला येत्या रविवारी नो व्हेईकल डे पाळण्याचं आवाहन केल आहे. अति आवश्यकता असल्यास टू व्हीलर आणि चारचाकी वाहनांचा वापर करावा, असं आवाहन बोर्डिकर यांनी केलं आहे. मेघना बोर्डिकर या स्वत: रविवारी नो व्हेईकल डे पाळणार आहेत.
कोल्हापुरात प्रत्येक शुक्रवारी वाहन बंद
लोकप्रतिनिधींनी वाहतुकीसाठी सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करावा, या आवाहनाला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा प्रतिसाद मिळालाय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी कागल तालुक्यातील सेनापती कापशी या गावापासून 60 किलोमीटरचा एसटी प्रवास केला. कोल्हापुरातल्या दसरा चौकातून त्यांनी रिक्षाने जिल्हा परिषदेत प्रवेश केला. मोदींनी केलेल्या आवाहन नंतर संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये दर शुक्रवारी नो व्हेईकल डे देखील पाळण्यात येत असून आज त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.. एसटीने प्रवास केल्यामुळे इंधन बचत झालीच, शिवाय लोकांशी संवाद साधता आला. त्यांच्या समस्या जाणून घेता आल्याचे, शिल्पा खोत यांनी सांगितलंय.
नागपुरात सोमवारपासून सार्वजनिक वाहनाने प्रवास
नागपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी दर सोमवारी सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार आहेत. सोमवार 18 मे पासून या उपक्रमास सुरुवात होणार आहे. मोदी यांनी इंधन बचत आणि इतर काटकसरीचे उपाय सुचविल्या नंतर नागपूर जिल्हा परिषदेचा पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी हे सोमवारी स्वतः घरून कार्यालयापर्यंत पायी येणार आहेत.
