सर्वात मोठी बातमी ! जेवणाच्या टेबलवर किती तास चर्चा? धस आणि मुंडेंची भेट कुणाच्या घरी झाली?; कुणी केली मध्यस्थी?

Suresh Dhas And Dhananjay Munde Meeting : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या राजकारणात भूकंप झाला. धनुभाऊ विरुद्ध आम्ही सर्व असे वातावरण तयार झाले. पण आता धस-मुंडे यांच्या खास भेटीने धस मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

सर्वात मोठी बातमी ! जेवणाच्या टेबलवर किती तास चर्चा? धस आणि मुंडेंची भेट कुणाच्या घरी झाली?; कुणी केली मध्यस्थी?
धनंजय मुंडे, सुरेश धस
| Updated on: Feb 15, 2025 | 11:51 AM

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली. पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन जणू आरोपींचीच तळी उचलत होती. त्यावेळी जनआक्रोश झाला. अनेक नेत्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. त्यात भाजपचे आमदार सुरेश धस हे हिरारीने समोर आले. त्यांनी आका, आकाचे आका असे काहूर माजवले. त्यातून त्यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रखर टीका केली. खंडणी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, घोटाळ्यासाठी त्यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. त्यांनी दोन महिने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा किल्ला लढवला. पण अचानक त्यांनी धनुभाऊंच्या मांडीला मांडी लावून जेवणावर ताव मारल्याची आतील गोटातील बातमी फुटल्याने ते अडचणीत सापडले आहेत. या डिनर डिप्लोमसीमागे नेमकं कोण होतं, याची चर्चा आता रंगली आहे. हा धनुभाऊंच्या खुषकीचा मार्ग कोणी तयार केला आणि धस नेमके कसे अडचणीत सापडले याची चर्चा रंगली आहे.

चार तास डिनर डिप्लोमसी

भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी झाली. या भेटीविषयी सुरेश धस यांनी वेगळा सूर आळवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी जेवण्यासाठी दोघांना बोलावण्यात आले. या दोघांमध्ये चार तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या भेटीनंतर आता धसांवर चौफेर टीका होत आहे.

मतभेद असावेत मनभेद नसावेत

या भेटीविषयी बावनकुळे यांनी बाजू मांडली. सुरेश धस यांनी काही मुद्दे मांडले आहेत ते सरकारकडे मांडले आहे. आरोपींना सजा होत नाही, त्यांची भावना आहे. सर्व आरोपींना फाशीपर्यंत नेणं ही भूमिका त्यांनी मांडली आहे. या भूमिकेच्या पाठिशी पक्ष उभा आहे. पण हे करत असताना महायुतीतील नेते आहेत त्यांच्यासोबत व्यक्तिगत वाद नको. मतभेद जरुर असावे मनभेद नसावेत असे बावनकुळे म्हणाले.

दोघांकडून दावा काय?

दोघांना एकाच ठिकाणी बोलवण्यात आले असले तरी आपल्याला मुंडे येणार हे माहिती नव्हते, असे धस म्हणाले. तर विरोधकांनी आता हा सर्व प्रकार मुंडे यांना वाचवण्यासाठी सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यातच धस यांच्यावर आगपाखड होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी या भेटीवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. तर दुसरीकडे धनुभाऊंची यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us