मुंब्रा दिवा रेल्वे अपघातावर राज ठाकरेंचा संताप, म्हणाले आपल्या देशात…
मुंबईत झालेल्या रेल्वे अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी, अपुरे पार्किंग आणि फुटपाथ यासारख्या समस्यांवर लक्ष वेधले आहे. रेल्वे अपघातामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल आणि शहराच्या वाईट नियोजनाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत आज सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून CSMT कडे जाणाऱ्या लोकलमधून ८ प्रवासी पडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आपल्या देशात माणसाची किंमत नाही. मुंबईतील गर्दी नवी नाही, रेल्वेमंत्री काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
“रस्ते नसल्याने पार्किंग नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्राफिक अडलं जाते. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या अनेक ठिकाणी ही समस्या आहे. जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब आत जाऊ शकत नाही. अशी आपल्या शहराची अवस्था झाली आहे. आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही. आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे आहेत यामुळेच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय कोण जातंय तुम्हाला माहिती नाही. फक्त मेट्रो आणि बाकीच्या ज्या काही सोयी-सुविधा करत आहेत याने प्रश्न सुटणार नाही”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
तुम्ही रेल्वे अपघाताच्या बातम्या लावणार आहात का?
“मुंबईत मेट्रो, मोनो सर्व आहे. पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? टू व्हीलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबलंय का, त्या गाड्या येतात आहेत. नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनो कोण वापरतंय, कोणी पाहायला तयार नाही. सर्वजण फक्त निवडणुका, प्रचार यातच गुंतले आहेत. शहरं म्हणून याकडे कोणी बघायला तयार नाही. शहरांबद्दल बोललेल्या किंमत नाही. गेले अनेक दिवस राज ठाकरे – उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जितक्या बातम्या लावल्यात, तेवढा काळ तुम्ही रेल्वे अपघाताच्या बातम्या लावणार आहात का? आपण कशाला महत्त्व द्यायचं, कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हेच या सर्व गोष्टींमध्ये समजेना झालं आहे”, असेही राज ठाकरे म्हणाले.
केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं
“तुम्ही शहरातील गोष्टींकडे अधिक फोकस करा. सरकारचे लक्ष या गोष्टींकडे कसं जाईल, यावर तुम्ही लक्ष द्यायला हवं. बाकीच्या सर्व गोष्टी किरकोळ आहेत. केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं. लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही रोजची गर्दी पाहिली तर लोक आत कसे शिरतात, बाहेर कसे पडतात. मीही रेल्वेने प्रवास केलाय, त्यामुळे मला रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरील गर्दी माहिती आहे. तेव्हा गर्दी खूप कमी असायची. पण आता जर तुम्ही संध्याकाळी रेल्वेचा प्लॅटफॉर्म एकदा पाहा, तुम्ही त्यात आत शिरुन दाखवा. त्यानंतरही त्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं हे सर्व विलक्षण आहे”, असेही त्यांनी म्हटले.
आपल्या देशात माणसाची किंमत नाही
“रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा कशासाठी द्यावा, तिकडे जावं, त्यांनी बघावं. नसेल तर सुधारणा करावी. एकदा मुंबई लोकलमधून प्रवास करुन बघा, जर लोकलला दरवाजे बसवले तर लोक आत गुदमरुन मरतील. किती गर्दी असते त्याची तुम्हाला कल्पना आहे का, त्याची एक जागा बाहेर येण्यासाठी हवी आणि एक जागा आत येण्यासाठी हवी. माणसाची आपल्या देशात किंमतच नाही. हीच घटना जर परदेशात घडली असती, तर ते कसे बघतात. जे मंत्री परदेशात जातात, ते काय घेऊन येतात”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
