मुंबईवर पाणीकपातीचे संकट, कुठे, कधी, किती टक्के पाणीकपात?
मुंबईवर पाणीकपातीचे संकट! धरणांतील साठा केवळ २७ टक्क्यांवर आल्याने १५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने येत्या १५ मेपासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. त्यासोबतच यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळेच मुंबईकरांवर ही परिस्थिती ओढवली असून पावसाळा येईपर्यंत मुंबईकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
पाणीसाठा केवळ २७ टक्क्यांवर
मुंबईला अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, मोडक सागर, विहार आणि तुळशी अशा सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता सुमारे १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. मात्र, सध्या या धरणांमध्ये केवळ २७.०७ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा लक्षणीयरीत्या कमी असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कपातीचा निर्णय घेतला आहे.
दैनंदिन पुरवठ्यात मोठी घट
मुंबईला दररोज साधारणपणे ३,८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. साधारण १० टक्के कपात लागू झाल्यानंतर दररोज सुमारे ३८५ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळणार आहे. याचा सर्वाधिक फटका उंच इमारती आणि डोंगराळ भागातील वस्त्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावल्याने महापालिकेने राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव कोट्यातून अतिरिक्त पाणी मिळावे, अशी विनंती पालिकेने केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केल्यास मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
| धरणाचे नाव | पाणीसाठ्याची स्थिती (अंदाजे टक्केवारी) |
| विहार | ४८% |
| तुळशी | ४३.६७% |
| अप्पर वैतरणा | ४०.३५% |
| तानसा | ३९.१७% |
| भातसा | ३७.९३% |
| मोडक सागर | ३४.५५% |
| मध्य वैतरणा | ३२.९६% |
| एकूण सरासरी साठा | २८.३५% |
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा. बागांना पाणी देताना किंवा गाड्या धुताना पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या टाक्यांमधील गळती तपासावी. पावसाळा सुरू होण्यास अजून किमान सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.
