तांबे पिता-पुत्रांवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी पक्षासोबत…”
नागपूर आणि अमरावती येथे भाजपचे सिटींग आमदार होते. तरीही त्यांच्या दोन्ही जागा पडल्या. दुसऱ्याच्या घरात आग लावणाऱ्यांना जनतेनी जागा दाखविली, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
मुंबई : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे पिता-पुत्राबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, नाशिक (Nashik) पदवधीर मतदार संघाबाबत (Graduate Constituency) काँग्रेसकडून कुठलाही निर्णय गडबडला नाही. याची स्पष्टता आम्ही केलेली आहे. सुधीर तांबे यांच्याशी बोलणं झालं होतं. ते लढायला तयार होते. त्यांना कंटीन्यू करतो म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला धन्यवाद दिला. त्यांना त्यांच्या मुलाला लढवायचं असतं तर त्यांनी ते सांगितलं असतं. त्यांच्या मुलाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेता आली असती. पण, सुधीर तांबे यांनी ऐनवेळी पक्षाशी विश्वासघात केला. त्यांच्या कौटुंबिक भांडणात आम्हाला जायचं नाही. नाशिकच्या बाबतीत काँग्रेसची काही चुकी झालेली नाही, असं नाना पटोले म्हणाले.
त्यांना जनतेने जागा दाखविली
स्वतःचा उमेदवार उभा करायचा नाही. दुसऱ्याची घरं फोडायची. अशा भाजपची गत राज्यात काय झाली, असा सवाल नाना पटोले यांनी केला. नागपूर आणि अमरावती येथे भाजपचे सिटींग आमदार होते. तरीही त्यांच्या दोन्ही जागा पडल्या. दुसऱ्याच्या घरात आग लावणाऱ्यांना जनतेनी जागा दाखविली, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
तांबे यांच्यावरील प्रतिक्रिया मी निकाल आल्यानंतर देणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले. नाशिकच्या बाबतीत पक्ष क्लीअर होता. पक्षाचं कुठलंही धोरण चुकलं नाही. पक्षाला बदनाम करण्याचं काम कुणी करत असेल, तर आमची तयार असल्याचंही पटोले यांनी सांगितलं.
यावर हायकमांड निर्णय घेणार
आम्ही महाविकास आघाडी म्हणून उमेदवार उभे केले होते. सुधीर तांबे हेदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे राहणार होते. सुधीर तांबे यांनी पक्षाशी विश्वासघात केला. त्यानंतर शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. सुधीर तांबे यांना पुन्हा पक्षात घेणार का, यावर हायकमांड निर्णय करेल, असं नाना पटोले म्हणाले.
भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळं नागपुरात भाजप समर्थित उमेदवाराचा दारुण पराभव झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. उद्योगधंदे गुजरातमध्ये पाठविले. लोकांनी भाजपला धडा शिकवायचा निर्णय घेतला असल्याचं या निकालातून स्पष्ट होत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.