
Sharad Pawar Criticised: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगरपालिका- नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात महायुतीचे नेत्यांनी सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यात अजित पवारांपासून भाजप आणि शिंदे सेनेचे नेते हे विकास निधीचा वारंवार उल्लेख करत आहेत. विकास निधी हवा असेल तर आपला उमेदवार निवडून द्या असे थेट आवाहन करत आहेत. त्याचा शरद पवार यांनी जोरदार समाचार घेतला
पैसे किती द्यायचे?
निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मत मागितलं जातंय. पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठिकठिकाणी गट झालेत आहेत. पैसे, निधीवर मत मागितलं जातं आहे, ही चांगली गोष्ट नाही असा खरपूस समाचार शरद पवार यांनी घेतला. या निवडणुकीत एका पक्षातील गट दुसऱ्या पक्षासोबत जात आहे. पहिल्यांदाच अनेक ठिकाणी गट दिसून येत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीत एकवाक्यता नाही. पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हवा तो योग्य निकाल मतदार घेतील. याआधी आमच्यासारख्यांनी असे प्रयत्न केले नाहीत आता ही करणार नाहीत. मतदानासाठी दोन चार दिवस राहिले आहेत काय होते ते बघुयात अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा
मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ज्यांची जमीन वाहून गेली. मोठे नुकसान झाले, त्यांना सरकारने काही ना काही आर्थिक मदत देणे गरजेचे होते. आता राज्य सरकारने जे धोरण ठरवले, त्यात शेतकऱ्यांवरील कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. हा तात्पुरता दिलासा असल्याचे शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याची काही रक्कम सरकारने द्यायला हवी होती. तर काही व्याज माफ करुन कर्जाचे हप्ते पाडून दिले असते तर शेतकऱ्यांना अधिक मदत झाली असती असे शरद पवार म्हणाले. सध्याची मदत पुरेशी आहे असे वाटत नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी मांडले.