AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या’, परभणीच्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

"साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या", असं म्हणत परभणी जिल्ह्यातील विठ्ठलराव गरूड या शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपुलकीचं आमंत्रण दिलं आहे.

'कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या', परभणीच्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
| Updated on: Feb 24, 2020 | 11:21 PM
Share

मुंबई : “साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या”, असं म्हणत परभणी जिल्ह्यातील विठ्ठलराव गरूड या शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपुलकीचं आमंत्रण दिलं आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे या शेतकऱ्याने पहिल्यांदा कर्जमाफीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही, अशी भावना मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसमोर मांडलं.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या हस्ते आज महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झाली. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादीही प्रसिद्ध करण्यात आली.

“हेलपाटे मारावे लागले का?”

या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले? किती कर्ज होते? कुठल्या पीकाला कर्ज घेतले होते? आधीच्या आणि आताच्या कर्जमाफी योजनेमध्ये काय फरक जाणवला? असे अनेक प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना विचारले. त्यावर अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी योजनेबाबत 100 टक्के समाधानी असल्याची भावना व्यक्त केली. ‘मागील वेळी 5 ते 6 वेळा चकरा माराव्या लागल्या. आता केवळ एका अंगठ्यावर काम झालं’, असं मत मुकटे यांनी व्यक्त केलं.

“लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छा”

परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरूड यांनी कर्जमाफीची रक्कम मिळणार असल्यानं चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली. तसेच मुलीचं लग्न जमलयं, अशी आनंदाची बातमी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठं दिलं अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरखून गेलेल्या विठ्ठलराव यांनी लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचं आमंत्रणही दिलं.

योजनेच्या यशाचे श्रेय यंत्रणेला : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेच्या यशाचं श्रेय शासकीय यंत्रणेला दिलं. ते म्हणाले, “राज्यातील बळीराजांना कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ 60 दिवसात झाली. याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना राबवतांना आपण शेतकऱ्यांवर काही उपकार करीत आहोत, अशी भावना ठेवू नका. शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत. त्यामुळे आपण लाभार्थी आहोत.”

काही ठिकाणी अंमलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकऱ्यांनी नाराज होवू नये असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संयम ढळू देूऊ नका, बळीराजाला दुखावू नका, अशा सूचना त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

कर्जमुक्तीसाठी योजना : उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी राज्यशासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली. शेतकरी आनंदात रहावा त्याच्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं अशी आमची भूमिका आहे.”

35 दिवसांमध्ये 35 लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा

यावेळी अमरावती येथील सुरेश कोटेकर, सरीता गाढवे, बाबाराव दामोदर यांच्याशीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. योजनेंतर्गत 34 लाख 83 हजार 908 शेतकरी खात्यांची माहिती प्राप्त झाली आहे. आज 15 हजार 358 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. योजनेंतर्गत 35 दिवसांमध्ये 35 लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात आली. तसेच 15 दिवसांच्या आत या माहितीचे लेखापरिक्षण झाले आहे. ही योजनेची सर्व अंमलबजावणी संगणकीय पद्धतीने होत आहे. शेतकऱ्यांच्या मान्यतेनंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्याला नोंद पावती दिली जात आहे.

विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमास नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव दिलीप पांढरपट्टे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Parbhani Farmer invite CM Uddhav Thackeray

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.