Rain Update: खरीपाला धोका, रब्बीपूर्वी कोसळधार… अल निनोचे सावट कमी होताच सप्टेंबरमध्ये पावसाचा धमाका, हवामान विभागाचा अंदाज काय?
Rain Forecast in Maharashtra: तळकोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस असला तरी राज्यातील काही भागांना अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. अल निनोचे सावट अद्याप कमी झालेले नाही, हवामान विभागाचा अंदाज तरी काय?

Rain Forecast in Maharashtra: कोकणासह मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाने ढेकळं सुद्धा न फुटल्याने शेतकरी पेरणीविषयी चिंतेत आहे. खरीप हातचा जातो का? या चिंतेने त्यांच्या मनात घर केले आहे. राज्यातील अनेक भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते जून पाठोपाठ जुलै महिन्यातही पावसाची जोर’धार’ दिसणार नाही. पण अल निनोचे संकट निवळताच सप्टेंबरमध्ये पावसाची कोसळधार दिसले. रब्बीपूर्वी राज्यात पावसाची बॅटिंग दिसेल.
काय आहे अंदाज
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी याविषयीचा एक अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार, अल निनोच्या प्रभावामुळे जून पाठोपाठ जुलैमध्येही देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा 90 ते 94 टक्के पावसाची तूट जाणवेल. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुलनेने कमी पाऊस पडेल. जून ते ऑगस्ट या कालावधीत देशात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल. अल निनोचा प्रभाव कायम आहे. ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला अल निनोचा प्रभाव कमी होईल. त्यानंतर मात्र पावसाची दमदार हजेरी असेल असा अंदाज महापात्रा यांनी वर्तवला. रब्बी पिकासाठी हा पाऊस वरदान ठरण्याची शक्यता आहे.
1 ते 10 जुलैपर्यंत दमदार पाऊस
जुलै महिन्यात राज्यात मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल. तर महाराष्ट्रासह गुजरातमध्ये 1 ते 10 जुलैपर्यंत दमदार पाऊस पडेल. विदर्भात मात्र सरासरीपेक्षा जोरदार पाऊस पडेल. याच दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चार दिवस चांगला पाऊस होईल असे महापात्रा यांनी सांगितले.
राज्यातील अनेक भागात पेरण्या खोळंबल्या
नाशिकमध्ये दुबार पेरणीचे संकट
नाशिकमध्ये पाऊस लांबल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. उडीद, मूग आणि भुईमुग पिकांच्या पेरण्यांवर परिणाम होत असल्याने दुबार पेरणीच संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकर्यांना पाऊस लांबल्याने भुईमूग, मूग, उडीद पीक वगळून पेरण्या कराव्या लागू शकतात असा कृषी विभागाचा अंदाज आहे. पेरण्या लांबल्यानंतर पिकांवर रोगांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकर्यांना बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगरमध्ये शेतकरी पेरणीच्या प्रतिक्षेत
अहिल्यानगर जिल्ह्यात जून महिना संपला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने शेतीतील पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत. बी बियाणांच्या दुकानावर मोठी गर्दी असलेल्या जून महिन्यामध्ये यावर्षी तुरळक शेतकरी पाहायला मिळतात. जे शेतकरी बियाणे खरेदी करतात ते देखील पेरणी केलीच पाहिजे यासाठी बियाणे खरेदी करत आहे. जिल्ह्यातील 80 टक्के पेरण्या अजूनही रखडल्या आहेत. ज्या ठिकाणी शेतकर्यांनी पेरणी केली आहे, ती देखील पाऊस झाल्यामुळे केलेली पेरणी नसून धूळ पेरणी आहे. त्यामुळे शेतकर्यांसह कृषी सेवा केंद्र चालक देखील कमालीचे चिंताग्रस्त आहेत. जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. आता पाऊस चांगला झाला तरच शेतकर्यांना पेरणी करता येणार आहे.
एल निनोमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
एल निनोच्या प्रभावामुळे लासलगाव सह परिसरात गेल्या वर्षाच्या तुलनेत 16.47% पाणी झाल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे गेल्या वर्षी 1 मे 30 जून पर्यंत 442 मिलिमिटर पाऊस झाला होतो यंदा मात्र या दिवसात 74 मिलिमिटर पाऊस झाला आहे 100 मिलिमिटर पावसाची सरासरी गाठू न शकल्याने अनेक क्षेत्रांमध्ये पेरण्या झाले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाऊस सुरू झाल्यामुळे पेरण्या केल्या होत्या मात्र आता त्या शेतकऱ्यांवर उभारणीचे संकट अधिक गडद झाल्याने शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खरीपाची पेरणी लांबली
पावसाला महिनाभर उशिरा सुरुवात झाल्याने चाळीसगाव तालुक्यात यंदा खरीप पेरण्यांनाही विलंब झाला. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने सातत्य राखल्याने पेरणीच्या कामांना वेग आला असून तालुक्यात सुमारे ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा पूर्ण झाला आहे. यंदा कृषी विभागाने ८० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पुढील दहा दिवस पावसाने साथ दिल्यास उर्वरित क्षेत्रावरील पेरणीही पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असून यंदाही मोठ्या प्रमाणावर कपाशी लागवड झाली आहे. याशिवाय मका, बाजरी, तूर, ज्वारी, मुग, उडीद आणि भुईमुग या पिकांचीही लागवड सुरू असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा लागवडीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.