Sanjay Raut : पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, भाजप विसरला का? भारत-पाक सामन्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut big statement : आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. त्याविरोधात रविवारी उद्धव सेना आंदोलन करणार आहे. खासदार संजय राऊत यांनी या सामन्यावरून भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

Sanjay Raut : पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, भाजप विसरला का? भारत-पाक सामन्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊतांचा घणाघात
| Updated on: Sep 11, 2025 | 11:07 AM

Sanjay Raut on India-Pakistan Match : एकीकडे पहलगाम हल्ल्यावरून देशात पाकिस्तानविरोधात क्षोभ असतानाच दुसरीकडे अबुधाबीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होत आहे. 14 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया कप 2025 मध्ये दोन्ही संघ आमने-सामने येतील. हा सामना रद्द करण्याची देशभरात मागणी होत आहे. तर आज खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपवर बोचरी टीका केली आहे. पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, भाजप विसरला का? असा खडा सवाल त्यांनी भाजपला विचारला. त्याचवेळी येत्या रविवारी उद्धव सेना सरकारच्या भूमिकेविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही

पहलगाम हल्ल्यात 26 निरपराध भारतीय मारल्या गेले. त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही. या हल्ल्यातील दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या कारवाया कश्मिरमध्ये थांबलेल्या नाही. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे वक्तव्य सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंग आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी वारंवार मांडला. पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नसल्याचे ते म्हणाले. रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही असा दावा भाजप नेत्यांनी केला. मग आमचा प्रश्न आहे की खून आणि क्रिकेट कसं सोबत वाहणार? भाजपच्या हेतुवरच प्रश्नच चिन्ह निर्माण करत राऊतांनी भाजपला धारेवर धरले.


उद्धव सेनेचे सिंदूर रक्षा आंदोलन

आमचा सवाल भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजपच्या बड्या नेत्यांची या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी या सामन्याला विरोध केला आहे. हा सामना भरवण्याचा निषेध केला आहे. तर महाराष्ट्रात महिला आघाडी रस्त्यावर येईल. माझं कुंक, माझा देश अशा प्रकारचं आंदोलन करण्यात येणार आहे. ठाकरे सेनेची महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार असल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी भाजपच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला. जय शाह यांच्यासाठीच हा सामना खेळवल्या जात असल्याचे सूतोवाच केले.

शिंदे काय करताय?

भारत पाक सामना होणार नाही असा बाळासाहेब म्हणाले होते. ज्यांनी मैदान उखडलं ते सुद्धा शिंदे गटात आहेत. भारत पाकिस्तान मॅचच्या दरम्यान मोठे गॅम्बलिंग हे राजस्थान आणि उत्तरेतल्या राज्यात होत आहे असा मोठा आरोप त्यांनी केला. त्यांनी हा सामना न खेळवण्याचे आवाहन केले. तर या मुद्दावर एकनाथ शिंदे आता काय करताय असा सवाल त्यांनी केला.

राज ठाकरे- उद्धव ठाकरे भेट

जागा वाटपाबद्दल वृत्तपत्रातल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका वृत्तपत्रातल्या बातम्या या खोट्या आहेत. मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच आत मध्ये होतो तिथे दुसरं कोणीही नव्हतं तर मग आज काय झालं हे कोणाला माहिती आहे का? या खोट्या बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत, असा दावा राऊतांनी केला.