संघांची ताकद असेल तर अमित शाहांचा राजीनामा घ्या; संजय राऊत यांनी डिवचले
ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जेन-झी संवादावरून अमित शाह आणि संघाला लक्ष्य केले आहे. राऊत म्हणाले की, संघाची ताकद असेल तर जेन-झीवरील भूमिकेमुळे गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्यावा. मोदी-शाह यांच्यातील मतभेद, परदेशी गुप्तचर यंत्रणांचा वापर आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रामाणिकपणावरही त्यांनी भाष्य केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल जेनजीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांच्या भावनांचे स्वागत केलं. तसेच हे तरुण अधिक प्रामाणिक असल्याचं म्हटलं आहे. भागवत यांच्या या जेनजीशी झालेल्या संवादावरून ठाकर गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. जेनजींशी संवाद असला पाहिजे हे मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले पाहिजे. तसेच हिंमत असेल आणि ताकद असेल तर संघाने आधी अमित शाहांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि संघाला चांगलंच डिवचलं आहे. सरसंघचालकांनी जेनजींशी संवाद असला पाहिजे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना सांगितलं पाहिजे. संघाचे एक नेते अतुल लिमये असे म्हणतात की, जेन-जी देशविरोधी आहेत. आणि अमित शहांचंही तेच म्हणणं आहे. जेन-जींवर गोळ्या चालवण्यात आल्या. संघाची इतकी ताकद असेल आणि नैतिक पाठबळ असेल तर त्यांनी आधी अमित शहांचा राजीनामा मागावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं पाहिजे.
आम्ही काय समजावं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा संसदेत या विषयावर भाष्य करायला तयार नाहीत. अमित शहा म्हणतात, ही पोरं भरकटलेली आहेत. आणि भाजपची मातृसंस्था म्हणते ही पोरं आमची आहेत. आम्ही काय नक्की समजावं?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
परदेशी गुप्तचर यंत्रणेची मदत
मोदी आणि शहांचा या देशातील तपास यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांवर विश्वास राहिलेला नाही. म्हणून परदेशी गुप्तचर संस्थांची मदत घेतली जात आहे. देशाला धोका आहे या सगळ्या भाडे के टट्टूंपासून. नरेंद्र मोदींवर अमित शहांची पाळत आहे. अमित शहांची नरेंद्र मोदींवर पाळत आहे. आणि त्यासाठी सुद्धा परदेशी यंत्रणांचा वापर होतोय, असा दावा त्यांनी केला.
जरांगे प्रामाणिक
यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं. मनोज जरांगे हा मनानं प्रामाणिक माणूस आहे. त्यांच्या मनात कोणताही स्वार्थ नाही. ते आपल्या समाजासाठी लढत आहेत. भाजप आणि त्यांचे नेते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, असं राऊत म्हणाले.
