
Sanjay Raut on Ajit Pawar Plane crash : माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामागे संशयाचा धूर कायमच आहे. आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसात याविषयीच्या अनेक मुद्यांवर त्याचं मत मांडलं आणि हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. तर तपास यंत्रणांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नेमका तोच धागा पकडत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली. त्यांनी तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विमान अपघाताविषयीचे सत्य खरंच बाहेर येणार का याविषयी त्यांनी मोठा दावा केला आहे.
तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी
राज्यातील आणि देशातील तपास यंत्रणा या भाडXXX झाल्या आहेत. तपास यंत्रणा लाचार, गुलाम झाल्या आहेत. ईडी असेल, सीबीआय असेल, राज्यातील पोलीस यंत्रणा असेल, आयबी असेल अशा अनेक तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल, यावर आता लोकांचा, जनतेचा विश्वास राहिले नाही. जे सरकार आपल्या स्वार्थासाठी आणि चामडी वाचवण्यासाठी भारत माता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाशी ठेवू शकते, ते सरकार काहीही करू शकते. मोदी सत्तेत आल्यापासून कोणत्याही घटनेचा, अपघाताचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही. उलट हा तपास पक्षपातीच झाला, असा मोठा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
अजितदादांना घेऊन येणारं विमान सुद्धा गुजरातमधूनच आलं
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना क्लिन चिटच देण्यात आली. जे जे इतर पक्षातील भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले. त्यांना क्लिन चिट देण्यात आली. घात, अपघात, इतर अनेक प्रसंगांमध्ये तपास यंत्रणांनी काम केले नाही. देवेद्र फडणवीस जे म्हणत आहेत की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, तर नाही. तुमच्या सरकारवर विश्वास नाही तर तपास यंत्रणांवर विश्वास नाही. अहमदाबादच्या विमान अपघाताचं काय झालं? 300 च्या जवळपास लोक मारल्या गेले, पण झालं काय? अहमदाबादमध्ये विमान कसं पडलं हे सांगू शकाल? अजितदादांना घेऊन येणारं विमान सुद्धा गुजरातमधूनच आलं. लोकांच्या मनात संशय येणारच. तुम्ही तापस यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. न्यायालयापासून ते सर्व तपास यंत्रणा या तुमच्या टाचेखाली आहेत, हे अख्ख्या जगाला आणि देशाला माहिती आहे. मिस्टर फडणवीस इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो.
रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडले ते तुम्ही स्वतः तपासा. तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. अजितदादा गेल्यावरती तुमचं मन भरून आलं होतं ना? त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करत आहे. त्यात काही सत्य आणि तथ्य दाखवतोय अपघाताविषयी, तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवार यांच्याशी चर्चा करावी. संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधी बोलवायला पाहिजे. हाच निष्पक्ष पणा आहे. पण राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करत आहेत, ही तुमची उडवाउडवीची उत्तरं आहेत. तुमचं दुःखही ढोंग आहे, असा टोला ही राऊतांनी लगावला.
तर तपासाला गती आली असती
या अपघाताचं सत्र रोहित पवारांनी बाहेर काढलं आहे. खरंतर काल सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन मुलं, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना भेटले. फोटो आलेले आहेत. बैठक चांगली झाली असं चित्रावरून दिसत आहे. रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताविषयी जे प्रेझेंटेशन दिले, त्यावरही त्यांनी मोदींशी बोलायला हवं होतं. राजकीय चर्चा यापुढे ही होत राहिल. पण सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांनी या अपघाताविषयी चर्चा केली असती तर कदाचित तपासाला अधिक गती आली असती, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.