मुंबईत भीमा-कोरेगावसारखी परिस्थिती निर्माण झाली तर… संजय राऊत यांचा मोठा इशारा; असं का म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत भीमा-कोरेगावसारखी परिस्थिती उद्भवल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा गंभीर इशारा राऊत यांनी दिला आहे. सरकारने तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.

मुंबईत भीमा-कोरेगावसारखी परिस्थिती निर्माण झाली तर... संजय राऊत यांचा मोठा इशारा; असं का म्हणाले?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 11:36 AM

मनोज जरांगे पाटील हे हजारो समर्थकांसह मुंबईत धडकणार आहेत. ऐन गणेशोत्सवात जरांगे मुंबईत येत असल्याने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत वाट पाहू नये. जरांगे यांच्याशी सरकारने चर्चा करून मार्ग काढावा. नाही तर मुंबईत भीमा-कोरेगावसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा इशारा दिला आहे.

मुंबईत कायद्यापेक्षा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक आहे. सार्वजनिक उत्सव सुरू आहे. त्यामुळे जरांगेंनी मुंबईत येऊ नये ही पोलिसांची भूमिका आहे. ती योग्य आहे. राजकीय दृष्ट्या जरांगेंनी योग्य वेळ निवडली आहे. सरकारला कायदा सुव्यवस्था मेंटेन ठेवायची असेल तर सरकारच्या लोकांनी त्यांच्याशी बोलावं. हजारो लोक आले तर गंभीर परिस्थिती होईल. भीमाकोरेगाव सारखी परिस्थिती झाली तर त्याला राज्य सरकार आणि देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील. हा राज्याचा प्रश्न आहे. प्रमुख विरोधी पक्षांना बोलावून यावर चर्चा करावी. त्या चर्चेत जरांगेंचे प्रतिनिधी असावेत. गणपती उत्सवात भडका उडाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकारला गंभीर परिस्थिती निर्माण करायची आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईची का वाट लावत आहात?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एकत्र प्रवास केला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अमित शाह हे शिंदेंच्या गटाचे प्रमुख आहेत. तो गट अमित शाह यांनी स्थापन केला आहे. त्यामुळे शिंदे त्यांच्या पार्टी चीफच्या गाडीतून गेले तर त्यात नवलं काय? तुम्ही जरांगेंना मुंबईत येऊ देत नाही. अन् 56 गाड्या घेऊन सणासुदीत मुंबईत फिरता. पाच पाच रस्ते बंद करता. हे योग्य नाही. काल अमित शाह दक्षिण मुंबईत होते. त्यामुळे रस्ते बंद होते. नरीमन पॉइंटवरून माझ्याकडे येणाऱ्या एका व्यक्तीला पाच तास लागले. मुंबईची का वाट लावत आहात? मुंबईचा का छळ करत आहात? असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनीही वेषांतर करून जावं

भाजपचे आमदार पराग शाह यांनी वेषांतर करून अख्खा दिवस भिकाऱ्यांमध्ये घालवला. त्याचं राऊत यांनी कौतुक केलं. बहुतेक सर्व मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनी असं केलं पाहिजे. पराग शाहांचं कौतुकच आहे. त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितलं म्हणून त्यांनी वेषांतर केलं. या आधीही इतिहासात गौतम बुद्ध असतील, महावीर असतील किंवा अनेक राजे महाराजांनी आपल्या राज्यात आपल्या प्रजेची अवस्था काय आहे हे पाहण्यासाठी वेषांतर केलं होतं. ए आर अंतुले हे सुद्धा मुख्यमंत्री असताना वेषांतर करून फिरत होते. राज्याची परिस्थिती जाणून घेत होते. याला संवेदनशील नेतृत्व म्हणतात. पराग शाह यांना हे सूचवणाऱ्या धर्मगुरूचंही मी अभिनंदन करतो. त्यांनी शिष्याला अशा सूचना केल्या आणि पराग शाह यांनी त्या पाळल्या. राज्याचे मुख्यमंत्रीही वेषांतर करून जात होते. पण ते आमचं सरकार पाडण्यासाठी जात होते. रंगरंगोटी करून जात होते. सध्याचे डेप्युटी सीएमही वेषांतर करून जात होते. त्यांनी कधी कधी वेषांतर करून मराठवाड्यात जावं. तिथला दुष्काळ पाहावा, असा टोला राऊत यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us