Yashwant Sinha Praise PM Modi : कडवे टीकाकार यशवंत सिन्हा यांनी अखेर अनेक वर्षानंतर नरेंद्र मोदींची थोपटली पाठ, भरभरुन केलं कौतुक
Yashwant Sinha Praise PM Modi : अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात महत्वाची मंत्रीपद भूषवणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. यशवंत सिन्हा हे मोदी सरकारचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर सडकून टीका केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी नेते यशवंत सिन्हा हे नरेंद्र मोदी सरकारचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जातात. मागच्या अनेक वर्षांपासून ते मोदी सरकारवर टीका करत आहेत. पण आता अनेक वर्षानंतर त्यांनी मोदी सरकारच्या कुठल्यातरी कामाचं कौतुक केलं आहे. दिल्लीत झालेल्या ब्रिक्स परिषदेवरुन यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. त्यांनी ब्रिक्स परिषदेच्या यशाची अनेक कारणं सांगितली. भारताने मोकळेपणाने चीनसमोर आपले मुद्दे मांडले असं यशवंत सिन्हा म्हणाले. त्यामुळे जिनपिंग नाराज झाल्याची चर्चा आहे. मोदी सरकारची धोरणं आणि कामकाजावर नाराज होऊन माजी परराष्ट्र मंत्री राहिलेल्या यशवंत सिन्हा यांनी एप्रिल 2018 मध्ये भाजपशी नातं तोडलं होतं. त्यानंतर ते तृणमुल काँग्रेसमध्ये गेले. पण 2021 साली ते ममता बॅनर्जी यांच्या पक्षापासून सुद्धा वेगळे झाले.
2022 साली झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा विरोधी पक्षांचे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला. यशवंत सिन्हा IAS होते. IAS म्हणून काम केल्यानंतर ते राजकारणात आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात ते बलशाली मंत्री म्हणून ओळखले जायचे. देशाच्या अर्थ खात्यासह त्यांनी परराष्ट्र मंत्रालयही संभाळलं आहे. आता बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मोदी सरकारच्या कुठल्या तरी कामाचं कौतुक केलं आहे. ANI शी बोलताना त्यांनी ब्रिक्स परिषद यशस्वी ठरल्याचं सांगतं भारताच्या भूमिकेचं कौतुक केलं.
ब्रिक्स परिषदेच्या यशाची तीन कारणं
भारतात झालेली ही ब्रिक्स परिषद यशस्वी का ठरली? त्या मागची तीन कारणं त्यांनी सांगितली. एक म्हणजे जितक्या राष्ट्राध्यक्षांना या परिषदेसाठी निमंत्रित केलं होतं, ते सर्व आले. रशियाचे पुतिन आले, चीनचे जिनपिंग आले. ज्यांच्याबद्दल संशय वाटत होता, ते आले. दुसरं यश बैठकीनंतर जे संयुक्त घोषणापत्र जाहीर झालं ते आहे. मे महिन्यात दिल्लीत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती, पण त्यावेळी संयुक्त पत्रक काढलं नव्हतं. कारण मतभेद होते. पण आता प्रचंड मेहनतीने एकमत बनवून संयुक्त पत्रक काढलं. तिसरं यश म्हणजे अशा परिषदांवेळी द्विपक्षीय बैठका होतात. त्यात शी जिनपिंग यांच्यासोबतची बैठक महत्वाची होती.
Thank you to all BRICS leaders for making the Delhi Summit very productive and outcome oriented! pic.twitter.com/C3DMZWGgLL
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2026
चीनवर विश्वास ठेऊ शकत नाही
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर अनेकदा यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. पण यावेळी भारताने चीनसमोर मजबुतीने आपले मुद्दे मांडले. त्यामुळे जिनपिंग नाराज झाले. द्विपक्षीय बैठकांमध्ये चीन सोबतची बैठक महत्वाची होती. “आपण चीनवर विश्वास ठेऊ शकत नाही. चीनने अनेकदा आपल्याला त्रास दिला आहे. पाठित खंजीर खुपसला आहे. म्हणून चर्चा केली, तर त्यांच्यावर विश्वास ठेवता येऊ शकत नाही. द्विपक्षीय चर्चेत भारताने मजबुतीने आपले मुद्दे मांडले. चीनचे मुद्देही उपस्थित केले. त्यामुळेच कदाचित टेन्शन वाढलं” असं सिन्हा म्हणाले.
