ST : एसटीच्या 800 कंत्राटी चालकांना धक्का, आजपासून सेवा बंद; महामंडळाच्या निर्णयानं कोसळली बेकारीची कुऱ्हाड
वेतनावर खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचीच भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विभागवार विविध कंत्राटदारांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या.
पुणे : एसटी महामंडळातील (ST Mahamandal) 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा (Contract driver) बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. चालकांचा वापर कमी होत असल्याचे कारण महामंडळाकडून देण्यात आले आहे. एप्रिलमध्ये संप मिटल्यावर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. यावेळी कंत्राटी चालकांना मुदतवाढ देण्यात आलेली होती. सध्या महामंडळात कंत्राटी चालकांचा वापर होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दोन वर्षात एसटीची सेवा कोरोनाच्या (Corona) प्रसारामुळे पूर्णतः बंद होती. यावेळी मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे एसटीला सरकारने आदेश दिले होते. याच काळात खासगी संस्थांना कंत्राटी चालक नियुक्तीचे आदेश एसटी महामंडळाने दिले होते. नंतरच्या काळात एसटी संघटनांचा संप सुरू झाला. त्यामुळे पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात किंबहुना वाढवण्यात आली.
विभाग नियंत्रकांना आदेश
आता या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे एसटी वाहतूक महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाची कमकुवत आर्थिक स्थिती लक्षात घेता खर्च कमी करण्याच्या उद्देशाने नवीन भरती प्रक्रिया राबविली नाही.
वेतनावरचा खर्च कमी करण्याचा उद्देश
वेतनावर खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचीच भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विभागवार विविध कंत्राटदारांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. विविध विभागासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती.
पाच हजारांपेक्षा जास्त नवीन कंत्राटी चालकांची भरती?
राज्यभरात तब्बल 2176 कंत्राटी चालकांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कंत्राट घेऊनही कर्मचाऱ्यांची पूर्तता केली नसल्याने अखेर संबंधित कंत्राट रद्द करून कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. येत्या काळात एसटी प्रशासनाकडून नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. राज्यभरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त नवीन कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे.