‘काम करा, मग तिकीट मिळवा’, शालिनीताई पाटील यांनी आपल्याच नातवाचे कान टोचले

| Updated on: Apr 12, 2024 | 9:12 PM

"त्यांना मी जेष्ठतेच्या नात्याने सल्ला देते. पाच वर्षाअगोदर तयारी करावी लागते, कोणाचे तरी नातेवाईक असून उपयोग नाही. ऑफिसमध्ये बसून काहीही होत नाही. काम करा, मग तिकीट मिळवा. अपक्ष उभे राहून काही उपयोग नाही", अशा शब्दांत शालिनीताई पाटील यांनी आपल्या नातवाची कानउघाडणी केली आहे.

काम करा, मग तिकीट मिळवा, शालिनीताई पाटील यांनी आपल्याच नातवाचे कान टोचले
शालिनीताई पाटील यांनी आपल्याच नातवाचे कान टोचले
Follow us on

सांगली लोकसभा जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मतभेद बघायला मिळत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीत सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यास मान्य केलं आहे. पण असं असलं तरी सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसची बालेकिल्ला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी, अशी मागणी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देणं हे आपल्या पचनी पडलेलं नाही, असं उघड वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे विशाल पाटील हे आता अपक्ष उमेदवारी लढवण्याच्या तयारीत असल्याचीदेखील चर्चा आहे. या सर्व घडामोडींवर वसंत दादा पाटील यांच्या पत्नी आणि विशाल पाटील यांच्या आजी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्याच नातवाचे कान टोचले आहेत.

“मी विशाल पाटलांना काही म्हटले नाही. चंद्रहार पाटील योग्य आहेत. आता मतदान आले आहे. चंद्रहार पाटलांचं नाव फायनल झालं असून दिल्लीकर यात फेरविचार करण्याची शक्यता नाही. आता उशिर झाला आहे. चंद्रहार पाटलांच्या विरोधात उभे राहत आहेत. त्यांना मी जेष्ठतेच्या नात्याने सल्ला देते. पाच वर्षाअगोदर तयारी करावी लागते, कोणाचे तरी नातेवाईक असून उपयोग नाही. ऑफिसमध्ये बसून काहीही होत नाही. काम करा, मग तिकीट मिळवा. अपक्ष उभे राहून काही उपयोग नाही”, अशा शब्दांत शालिनीताई पाटील यांनी आपल्या नातवाची कानउघाडणी केली आहे.

‘काँग्रेस टिकवायला काँग्रेस लहान मुल नाही’

“चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांना योग्य वाटतात. काँग्रेसने सांगलीची जागा ठाकरेंना सोडली आहे. चंद्रहार पाटील योग्य आहेत. कारण ते दोन वेळा महाराष्ट्र केसरी झाले. तालमीतल्या पाचशे लोकांची त्यांच्याकडे संघटना आहे. एकेकाळी मी येथे लोकसभेची निवडणूक लढले आणि जिंकले. त्या काळात साखर उद्योगाबाबत भारत सरकारचं धोरण मी बदलवलं. काम केलं. असे काम करावे, मी कोणाचा तरी नातेवाईक आहे एवढं पुरे नाही. काँग्रेस टिकवायला काँग्रेस लहान मुल नाही. काँग्रेसला 100 वर्षांची परंपरा, ते लहान मुलांचं काम नाही”, असादेखील टोला शालिनीताई पाटील यांनी लगावला.