पवार मैदानात, तातडीची बैठक बोलावली, काय निर्णय होणार? ऐन गणेशोत्सवातच…
गणेशोत्सवात शरद पवारांनी तातडीची राष्ट्रवादी बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याच्या दुष्काळी परिस्थितीवर, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारचे अपयश आणि पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा होणार आहे. या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असून, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सध्या राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपले कार्यक्रम बाजूला ठेवून गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. शरद पवार स्वत: या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीवर भाष्य केलं आहे. दर 15 दिवसाने अशा प्रकारची बैठक आम्ही घेत असतो. आजही या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत पक्षाची भविष्यातील वाटचाल आणि राज्यासह देशातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीममध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच बाकीच्या विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
सरकार अपयशी ठरलंय
शशिकांत शिंदे यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जरांगे थेट मुंबईला येणार की नाही याबाबतची मला माहिती नाही. पण मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत यावं लागतंय हे सरकारचं अपयश आहे. आधी सरकारने जरांगेंशी चर्चा सुरू केली. नंतर अचानक जरांगेंशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला. जरांगेंकडे प्रतिनिधी पाठवायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामागचं कारण माहीत नाही. मंत्रिमंडळातही जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा झाली. यावेळी आंदोलनामागे राजकीय अजेंडा आहे का? असा सवाल करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहींनी नाराजी व्यक्त केली. खरं तर जे आंदोलन करतात, त्यांना राजकारण विरहित पाहून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, ही सरकारची भूमिका असली पाहिजे. पण तसं दिसून येत नाही. खरं तर हे आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.
श्रेयवादाची लढाई सुरू
जरांगेंच्या शिवराळ भाषेवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या माहितीप्रमाणे त्यांची भाषा तशीच आहे. सत्तेतील व्यक्ती असो वा विरोधी पक्षातील असो, जरांगे सर्वांशी त्यांच्या भाषेतच बोलतात. ते रागातून बोलायचे. सरकारने त्यांना आश्वासने देऊन पूर्ण केले नाही, त्याचा त्यांना संताप आहे, म्हणून त्या रागातून ते असं बोलत आहेत. तुम्हीच त्यांना सर्व आश्वासने दिली होती. त्या आश्वासनाच्या पूर्ततेची माहिती पटवून देण्यात तुम्ही कमी पडला. तुम्ही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांनी भूमिका घेतली, असं सांगतानाच जरांगे यांच्या आंदोलनावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.