मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, शिवसेना नेत्याच्या मुलाचा विवाह साधेपणाने पार पडणार
विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरभ यांचा 28 फेब्रुवारीला होणारा विवाह होणार आहे. | Vinod Ghosalkar
मुंबई: कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे मोठे सोहळे करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनला प्रतिसाद देत शिवसेना नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar ) यांनी आपल्या मुलाच्या लग्नसोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. हा विवाह सोहळा विलेपार्ले पूर्व एअरपोर्ट येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा लग्नसोहळा आता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडेल. (Shiv Sena leader Vinod Ghosalkar cancel his son’s grand wedding in Mumbai)
विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरभ यांचा 28 फेब्रुवारीला होणारा विवाह होणार आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री, नेतेमंडळी उपस्थित राहणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत विनोद घोसाळकर यांनी पंचतारांकित सोहळा रद्द करण्याचे ठरवले. मात्र, हा विवाह ठरल्याप्रमाणे संपन्न होईल.
विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना हा निर्णय कळवला. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच चिरंजीव सौरभ घोसाळकर याचा विवाह सोहळा 28 फेब्रुवारी 2021रोजी ठरविण्यात आला. यासाठी घोसाळकर कुटुंबीयांनी जय्यत तयारी सुरू केली होती. असे असतानाच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनोद घोसाळकर यांनी दिली.
राज्यातील प्रमुख नेत्यांकडून दौरे रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाविकासआघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी आपले दौरे रद्द केले होते. शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शरद पवारांनी हा निर्णय घेतला होता.
राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी
राज्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारपासून राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. तसंच कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात अशा तत्सम कार्यक्रमांचं आयोजन करु नये, अशी तंबीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
(Shiv Sena leader Vinod Ghosalkar cancel his son’s grand wedding in Mumbai)