Sunetra Pawar Gungi Gudiya Row : काँग्रेस इतिहास विसरली काय? गुंगी गुडियाचे पडसाद? सत्ताधाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' संबोधल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत हा महिला नेतृत्वाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. इंदिरा गांधींनाही पूर्वी असेच संबोधले होते, याची आठवण करून देत, काँग्रेसने तात्काळ माफी मागावी अशी मागणी अनेक नेत्यांनी केली आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणून हिणवलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना डिवचलं आहे. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील, असा खोचक सवाल काँग्रसने केला आहे. काँग्रेसच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. काँग्रेसच्या या विधानाचा सत्ताधाऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. हा समाचार घेतानाच काँग्रेसला जुन्या इतिहासाचीही आठवण करून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे.
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस आपला इतिहास विसरली का? असा प्रश्न आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना देखील गुंगी गुडिया बोलले जात होतं. गुंगी गुडिया बोलणं हा महिला नेतृत्वाचा अपमान आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.
महिलांची माफी मागा
मंत्री दत्ता भरणे यांनीही काँग्रेसच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. मी काँग्रेसच्या या विधानाचा निषेद्ध व्यक्त करतो. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे मोठे सामाजिक काम आहे. उत्तम व्यवसायिक आणि शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. महिलांचा सन्मान म्हणून राज्याची ओळख राहिली आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार आणि महिलांची देखील माफी मागावी. काँग्रेसचा महिलांचा सन्मान करण्याचा इतिहास आहे, पण ज्यांनी हे वक्तव्य केले असेल त्यांचा निषेध, असं दत्ता भरणे यांनी म्हटलं आहे.
मौनी बाबा कोण होते?
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनीही काँग्रेसच्या या विधानावर टीका केली आहे. गुंगी गुडिया कोण होतं हे काँग्रेस काळात बघितलं आहे. कोणाला हिणवलं जात होतं यांचे आत्मपरीक्षण काँग्रेसने करावे. मौनी बाबा कोण होते? हे काँग्रेसने बघावे, असा खोचक टोला बन यांनी लगावला आहे.
मी धिक्कार करतो
राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही काँग्रेसच्या या विधानाचा धिक्कार केला आहे. अशा वक्तव्यांचा धिक्कार केला पाहिजे. इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया बोललं गेलं, नंतर त्यांनी काय केलं सगळ्यांना माहिती आहे. दादांच्या खांद्याला खांदा लावून सुनेत्रा पवारांनी सामाजिक काम केलंय. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विधानाचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.
बोलू शकत नाही
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केलेल्या वक्तव्यवर सकारात्मक किंवा नकारात्मक काहीही बोलू शकत नाही. गुंगी गुडिया असं म्हटलं आणि ते चुकीचं बोले आहेत असं अजित दादांच्या पक्षातील लोकांना वाटतं असेल तर चुकीचं नाही. इंदिरा गांधी यांना देखील गुंगी गुडिया म्हटलं जायचं, असं रोहित पवार म्हणाले.
इंडिया आघाडीतून बाहेर पडा
राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना “गुंगी गुडिया” संबोधून काँग्रेस पक्षाने फक्त वहिनींचा नाही तर, विधानसभा निवडणुकीत देशातील रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून देणाऱ्या संपूर्ण बारामतीकरांचा आणि पर्यायाने शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीयांचा अपमान केला आहे. सुनेत्रा वहिनींनी वेळोवेळी मोजक्या शब्दात आणि योग्य वेळी मौन ठेवून राजकारणातील आपले आणि आपल्या पक्षाचे स्थान बळकट केले आहे. त्यांचा धीरोदात्तपणा देशाने अनुभवला आहे. त्यामुळे काँग्रेसने त्याची काळजी करू नये. शरद पवारांनी काँग्रेस पक्षाला सुनेत्रा वहिनींची जाहीर माफी मागायला लावावी अन्यथा इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, असं उदयकुमार आहेर यांनी म्हटलं आहे.
खच्चीकरण करण्याचा प्रयत्न
संगिता तिवारी यांनीही या विधानाचा निषेध नोंदवला आहे. गुंगी गुडिया या वक्तव्याचा मी निषेध करते. हे विधान योग्य नाही. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर खंबीरपणे राजकीय वाटचाल सुरू केली आहे. पण अशी विधाने करून एका महिलेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं संगिता तिवारी म्हणाल्या.
माफी मागा
भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे मानसिक संतुलन बिघडलेले नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या बाबतचे वक्तव्य अत्यंत नीच, लाजिरवाने आणि स्त्री जातीचा अपमान करणारे आहे. स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची भाषा इतक्या खालच्या पातळीवर घसरली आहे का? एका कर्तुत्वान महिलेचा असा अपमान करून काँग्रेसने आपली विकृत मानसिकता पुन्हा दाखवून दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनेत्राताईची आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांची तात्काळ माफी मागावी, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
वहिनी त्यांची बूज ठेवू नका
माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुनेत्रा वहिनींना बोलायला दिलं नाही. हे त्यांनी बघावं. मी त्यांचा अपमाना करणार नाही. त्या हुशार आहेत. त्याचा जन्म मोठ्या राजकीय घराण्यात झाला आहे. पण त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दूर सारलं पाहिजे. वहिनी यांची बूज ठेवू नका. तुमचा ठसा उमटवा. स्वर्गीय अजित पवार यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. पण त्यासाठी करारी बाणा असला पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
ही भाषा पटते का?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ट्विट केलं आहे. गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
मला काही माहीत नाही
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. मला त्यावर काही माहीत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
त्यांच्याच नेत्याची टिंगल उडवली
शरद पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात यापूर्वी असा शब्द वापरला गेला होता. त्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान होत्या, हे जागने पाहिलं आहे. इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत देशातील कोणताही पंतप्रधान पाकिस्तानचे दोन तुकडे करुन त्यांना अद्दल घडवायचं काम करु शकलेले नाही. प्रत्येक नेता आपल्या ठिकाणी श्रेष्ठ असतो, ज्यांचा गुंगी गुडिया उल्लेख केला, त्यांनी काय केलं हे इंदिरा गांधींच्या बाबतीत आपण बघितलं. सुनेत्रा वहिनींना पदभार स्वीकारुन अजून सहा महिनेही झालेले नाही. काँग्रेसला अशी असंवेदनशील वक्तव्ये करणं शोभत नाही. सुनेत्रा वहिनींसदर्भात असं वक्तव्य करुन काँग्रेसने त्यांच्याच नेत्या इंदिरा गांधींची एक प्रकारे टिंगल केली असं दिसतेय, असं उमेश पाटील म्हणाले.
काँग्रेस टुकार नेतृत्वाच्या हाती
काँग्रेसची सुसंस्कृत राजकीय विचाराची परंपरा राहिलेली आहे. आताची काँग्रेस विचार आणि जनतेपासून दूर गेलेली आहे. महिलेचा सन्मान नुसता भाषणातून नाही तर विचारातून दाखवावा लागतो. पोस्टवरून काँग्रेसची मानसिक स्थिती दिसून येते. राज्यातील काँग्रेस टुकार नेतृत्वाच्या हातात गेली आहे, असं सुरज चव्हाण यांनी म्हटलंय.
