
मतदान यादीतील घोळावर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधी शिष्टमंडळाने टीकेची झोड उठवली. राज्य निवडणूक आयोगासोबत गेल्या दोन दिवसांपासून शिष्टमंडळाने चर्चेची फेरी केली. पण आयोगाच्या उत्तराने शिष्टमंडळाचे समाधान झाले नाही. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेते आयोगाच्या एकूणच भूमिकेवर नेत्यांनी चांगलाच आसूड ओढला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आयोगावर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यांच्या भेदक प्रश्नांमुळे आयोगाची भांबेरी उडाल्याचे समोर आले.
ही आयोगाची करप्ट प्रॅक्टिस
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल केला. आतापर्यंत लोकांनी मतदान केलं नाही का. आता जो खेळ सुरू आहे. खोटा कारभार सुरू आहे. म्हणूनच म्हटलंय निवडणुका घेऊ नका. हा घोळ दुरुस्त करा. निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित निवडणूक पार पाडणं आहे. त्यावेळी आमच्याकडून चूक झाली तर आमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो. करप्ट प्रॅक्टिस म्हणून. म्हणून आम्ही म्हणतो ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. हा त्यांचा भ्रष्टाचार आहे. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा हक्क हिरावला होता. आता निवडणूक आयोगाला काय शिक्षा करायची, असा सवाल त्यांनी केला.
भाजपला सोबत येण्याचे आवाहन
भाजपची यात ढवळाढवळ नसेल तर त्यांनी आमच्यासोबत यावं, असं आवाहन त्यांनी भाजपला केले. हा सर्वच पक्षांचा विषय असल्याचे ते म्हणाले. मतदान यादीतील घोळावर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही त्यांनी ताशेरे ओढले. निवडणूक आयोग उत्तरच देत नसल्याचे आणि अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
अमूक तारखेच्या आधी निवडणुका घेतल्या पाहिजे असं काही आयोगाचं म्हणणं नाही. आयुक्त म्हणाले, सकारात्मक विचार करतोय. आम्ही म्हटलं विचार करून चालणार नाही. या गोष्टी होता कामा नये. जे मतदार हयात आहेत. त्यांचा अधिकार हिरावून घेतला. त्यांच्यावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का, असा सवाल त्यांनी केला. ईव्हीएमवर आमचा आक्षेप आहे. महापालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवर होणार आहे. पण व्हीव्हीपॅट राहणार नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग देणार नाही. त्यामुळे आम्ही हुकूमशाही मान्य करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.