
मुंबईतील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गुंडगिरीच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी वर्गमित्राची हत्या केली. हत्या केल्याचे कळू नये म्हणून त्यांनी मित्राचा मृतदेह हा तलावात फेकून दिला. हत्येनंतर नंतर 14 वर्षांच्या मुलांनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतरही त्यांनी मित्राचा बुडून मृ्त्यू झाल्याचे सांगितले. पण शेवटी दोघांनी हत्या केल्याची कबूली दिली.
नेमकं काय घडलं?
ही घटना मुंबईतील भांडुप येथे घडली आहे. भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशेत पाडा परिसरात सिद्धार्थ वास्तव्यास होता. २२ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास तो खेळायला जातो सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थ घरी न आल्याने पालकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, कुठेच न सापडल्याने अखेर पालकांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास आणि शोध सुरू असतानाच मुलुंड पोलिसांच्या हद्दीमध्ये विहार तलावाजवळ २३ फेब्रुवारीला सिद्धार्थचा मृतदेह सापडला.
भांडुपमधील मुले विहार तलावात पोहण्यासाठी जातात, त्यानुसार पोहण्यासाठी गेला असता सिद्धार्थ बुडाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अपमृत्यूची नोंद केली. याचदरम्यान सिद्धार्थचा शवविच्छेदन अहवाल आला. त्यात सिद्धार्थच्या फुफ्फुस आणि पोटात पाणी नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर डोक्याच्या मागील बाजूस दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचेही अहवालात नमूद होते. यावरून पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला.
पोलिसांनी घेतला शोध
सिद्धार्थला त्याच्या एका मित्रासोबत शेवटचे पाहिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्यानुसार या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आम्ही चौघे पोहायला गेलो होतो, त्यावेळेस सिद्धार्थ बुडाल्याचे तो सांगू लागला. इतर दोन मित्रांनीही चौकशीत हेच सांगितले. शवविच्छेदन अहवालानुसार हत्येचा संशय असल्याने पोलिसांनी तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली असता अखेर त्यांनी सिद्धार्थला मारून तलावात टाकल्याचे कबुल केले. सिद्धार्थ आमच्यावर कायम दादागिरी करायचा. त्याला इंगा दाखविण्यासाठी तलावाजवळ बोलावून मारहाण केली. मारहाणीत काठीचा मार डोक्यावर बसल्याने तो बेशुद्ध पडला होता.