फडणवीस, शिंदेंवर वारंवार बोलणं… उदय सामंत यांचा जरांगेंना मोठा सल्ला; नेमकं काय म्हणाले?
उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना शिंदे-फडणवीसांवरील टीका टाळण्याचा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक निर्णय या सरकारने घेतले आहेत. १५ पैकी १२ मागण्या मान्य झाल्या असून, उर्वरित तीन कायदेशीर बाबींमध्ये आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आंदोलन न करण्याचे आवाहन सामंत यांनी केले, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे प्रश्न सोडवले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाचे प्रश्न सोडवले आहेत. आजही सोडवत आहेत. मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय या दोघांनी घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वारंवार बोलणं आणि मंत्र्यांवर वारंवार बोलणं हे काही योग्य नाही. जरांगेंनी जरा संयमाने घ्यावं, असा सल्लाच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही. मराठा समाजाला न्याय दिला नाही, त्यांचं कौतुक केलं जातं. जरांगेंना विनंती आहे. आमचे दोघांचे संबंध राजकारण आणि आंदोलनाच्या पलिकडचे आहेत. तुमच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या आहेत. तीन मागण्यात कायदेशीर बाबी आहेत. तुम्ही वेळ दिला तर त्यातून मार्ग निघेल. जरांगेंनी समजून घ्यावं, असं उदय सामंत म्हणाले.
पहाटे 3 वाजता चर्चा
मागण्या मान्य केल्या त्या रास्त आहेत. ज्या प्रलंबित आहे, त्याला कालावधी द्या. मी आणि प्रसाद लाड यांनी पहाटे 3 वाजता जरांगेंशी फोनवर चर्चा केली. अर्धा तास आम्ही बोललो. त्यांच्या अनेक शंकांचं निरसन केलं. त्यामुळे जरांगे आता सलाईन घेत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरात आयुक्तालयात बैठक आयोजित केली आहे. मी आणि लाड निघालो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
भेटीसाठी नव्हे, आढावा घेण्यासाठी…
जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून दर तासाला, दर मिनिटाला आम्ही विनंती करत आहोत. त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. ज्या मागण्या मान्य केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी कशी होतेय याची माहिती घेण्यासाठी आयुक्तालयात जात आहोत, असं सांगतानाच जरांगेंना भेटण्यासाठी जात आहे, असं मी म्हणालो नाही. आम्ही आयुक्तालयात मागण्यांचा आढावा घेण्यासाठी जात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यावर विश्वास ठेवू नका
एकनाथ शिंदे हे विरोधी गटाला बळ देत आहेत हा गैरसमज आहे. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय. फडणवीस आणि शिंदे अशा काही गोष्टी करतील असं काही नाही. त्यावर जरांगेंनी विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अडचण होणार नाही याची दक्षता घ्या
मनोज जरांगे पाटील यांनी 12 सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर ते मुंबईत येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गणेशोत्सव सुरू होत आहे. हिंदूंचा हा सर्वात मोठा सण आहे. मुंबईतील गणेशोत्सवाकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. तिथे अडचण येता कामा नये. जरांगेंनी मुंबईत येऊन अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.