ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी ठाकरे सेनेची मोठी खेळी, लोकसभा अध्यक्षांना थेट पत्र, काय केली मागणी, दिल्लीत मोठ्या घडामोडी
Shivsena Udhav Thackeray- Eknath Shinde: रविवारी मुंबईत ठाकरे सेनेच्या खासदारांच्या बैठकीतूनच बंडाची शक्यता वाढली होती. तर रात्रीतून दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. 6 खासदार शिंदे सेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी ठाकरे सेनेने हे संभाव्य बंड रोखण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिले आहे.

Operation Tiger Shivsena MP Split: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांच्या स्वतंत्र गट अथवा अन्य पक्षात विलीनीकरणास मान्यता देऊ खासदार अरविंद सावंत यांच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र धाडले आहे. पक्षातील संभाव्य फुट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने हे पत्र पाठवले असले तरी त्यातूनच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पक्षातील 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तर शिंदे हे रात्रीच दिल्लीत डेरे दाखल आहेत. पाठोपाठ उद्धव सेनेचे सहा खासदारही राजधानीत पोहचल्याचे वृत्त समोर आले आहे. आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
उद्धव सेनेचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
उद्धव ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा एकच पक्ष आहे. लोकसभेत कोणत्याही स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. तर काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचा अथवा दुसऱ्या पक्षात विलीन होत असल्याच्या वृत्तांवर उद्धव सेनेने आक्षेप नोंदवला आहे.
खासदार अरविंद सावंत यांच्या पत्रात आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यात आला आहे. माध्यमांमध्ये अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत की, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले काही खासदार लोकसभेत स्वतंत्र गट अथवा मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलिनीकरणासाठी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाशी संपर्कात असल्याचे या वृत्तातून समोर येत आहे. त्यामुळे हा पत्रप्रपंच करत असल्याचे ठाकरे सेनेने स्पष्ट केले.
या सर्व घडामोडी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्याशी संबंधित घटनात्मक तरतुदींबाबत आहेत. त्यामुळे उद्धव सेनेची भूमिका नोंदवणे आवश्यक असल्याचे अरविंद सावंत यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. कायदेशीरदृष्ट्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा एकच राजकीय पक्ष आहे. तो तसाच राहतो. संसदीय पक्षाचे अस्तित्व हे पूर्णपणे राजकीय पक्षावर अवलंबून आहे. संसदीय पक्ष हा राजकीय पक्षाचाच एक घटक आहे. एका पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक स्पर्धात्मक गटांना घटना, संविधान मान्यता देत नाही. त्यामुळे संसदेत केवळ एकच अधिकृत पक्ष नेतृत्व, एकच अधिकृत पक्षप्रतोद(व्हिप) आणि एकच मान्यताप्राप्त पक्षरचना असू शकते. याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्राचे राज्यपाल आणि इतर या 2023 खटल्यात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी या पत्रात दिली आहे.