आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? कंम्बोज भेटीवरून शिंदे गोटातून धडाडली तोफ, जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नाला उद्धव सेना उत्तर देणार?
Shinde Shivsena on Aditya Thackeray: ऑपरेशन टायगरच्या वार्तांनी राजकारण ढवळून निघाले. शेवटी शिंदे गोटातून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. काल खासदार अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर शिंदे सेनेतून मोठा हल्लाबोल करण्यात आला आहे.

Jyoti Waghmare on Aditya Thackeray: ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले. 8 खासदार लवकरच शिंदेंशाहीत दाखल होतील असा दावा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. गेल्या दोन दिवसात पुन्हा या चर्चांना उधाण आले. त्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अशा खोडसाळ बातम्यांवर तोंडसुख घेतले. त्यानंतर त्यांनी मातोश्री गाठली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या बातम्या धादांत खोट्या असल्याचा सूर आळवला. तर आता शिंदे गोटातून थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
दिल्लीत काय घडामोड?
या महिन्याच्या सुरूवातीला ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. त्यातच खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रम आयोजित केला. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाला हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख हे उपस्थित होते. गेल्यावर्षी सुद्धा उद्धव सेनेचे काही खासदार या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजर होते. मतभेद असले तरी मनभेद नाही असा नेम त्यांनी त्यावेळी सांगितला होता. दोन्ही पक्षांची दिशा वेगळी असली तरी आजही अनेक खासदार, आमदारांमध्ये संवाद सुरूच आहे. पण या भेटीवरून राजकारण तापले. काल तर खासदार अरविंद सावंत यांनी या स्नेहभोजनच्या कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या स्वपक्षाच्या खासदारांनाच सुनावले.
ज्योती वाघमारेंनी डागली तोफ
तर याप्रकरणावर पडदा पडण्याऐवजी आता वाद पेटला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार ज्योती वाघमारे यांनी या सर्व घाडमोडींचा समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे कंबोज आणि ठाकरे यांच्यात पॅचअप झाल्याचे समोर आले होते. याचीच आठवण ज्योती वाघमारे यांनी करून दिली.
ठाकरे सेनेकडून खासदारांची निष्ठा तपासल्या जात असल्यावरून वाघमारे यांनी तोफ डागली. कंबोज यांच्या पार्टीला जाणाऱ्या आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? असा जिव्हारी लागणारा बाण त्यांनी सोडला. सध्या उबाठा गटात संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग अत्यंत जोमाने सुरू असल्याचे दिसते. खासदारांना रोज निष्ठा ही कागदावर लिहून द्यावी लागते. आणा भाका घ्यावा लागतात. अग्नि परीक्षा द्यावी लागते. मग हाच न्याय युवराजांना लावणार का? खासदारांच्या निष्ठा तपासणारे युवराजांच्या सुद्धा निष्ठा तपासणार का? असा जळजळीत सवाल ज्योती वाघमारे यांनी विचारला आहे.