इथेनॉलमुळे साखर महागली? मोठी अपडेट काय? कृषी अर्थतज्ज्ञ काय म्हणाले?
महाराष्ट्रासह देशात साखरेचे भाव वाढले आहेत, ज्यामुळे सामान्य बजेट कोलमडले आहे. अनेकजण इथेनॉलला या दरवाढीस जबाबदार धरत असले तरी, कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी हे मत फेटाळले आहे. त्यांच्या मते, साखर नियंत्रणात सरकारचे अपयश, कमी उत्पादन असतानाही निर्यात आणि बफर स्टॉकचा अभाव ही खरी कारणे आहेत.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात 40-50 रुपये किलो मिळणारी साखर आता 70 ते 80 रुपये किलो मिळायला लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव प्रचंड वाढल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे. साखर महागल्याने चहापासून जिलेबी, मिठाईसह सर्वच गोड पदार्थांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांचं किचनचं बजेट कोलमडलं आहे. इथेनॉलमुळेच साखरेचे भाव वाढले असल्याचा दावा सामान्य नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, खरोखरच इथेनॉल आणि साखरेच्या दरवाढीचा काही संबंध आहे का? प्रसिद्ध कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी यावर भाष्य केलं असून मोठी अपडेट दिली आहे.
कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना साखरेच्या वाढत्या भावावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साखरेचे भाव वाढले हे खरे आहे. पण साखरेवर सर्व नियंत्रण सरकारचंच आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या भावाची जबाबदारीही सरकारचीच आहे, असं सांगतानाच इथेनॉलमुळे साखर महाग झाली ही चर्चा चुकीची आहे. इथेनॉलमुळे ही तेजी आली नाही. मागच्या दोन वर्षात साखरेचं उत्पादन कमी झालं आहे. उत्पादन कमी झालेलं असतानाही आपण साखरेची निर्यात सुरू ठेवली. त्याचप्रमाणे आपण इथेनॉलकडेही वळलो. त्याचा हा परिणाम असल्याचं विजय जावंधिया यांनी म्हटलंय. आपण साखरेचा बफर स्टॉक का ठेवला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
सरकारला मॅनेज करण्यात अपयशी
साखरेवर सर्वस्वी सरकारचं नियंत्रण आहे. पण सरकारला ते मॅनेज करता आलं नाही. इथेनॉलसाठी आपण फक्त 32 टक्के ऊस वापरतो. जेव्हा पुरवठा नीट असतो तेव्हा व्यापारी नफा कमावतो. जेव्हा पुरवठ्याचा शॉर्टेज असतो तेव्हा तो होल्ड करतो. आंतराष्ट्रीय़ बाजारात सारखेची किंमत वाढली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साखरेचे भाव वाढवले. हे सर्व गौडबंगाल आहे, असा आरोप जावंधिया यांनी केला आहे.
ब्राझिलची नक्कल भोवली
साखरेच्या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. उपभोगत्यांनाही झाला नाही. सरकारने साखर आयात केली. ती कच्ची साखर आयात केली, असं सांगतानाच ब्राझिलमध्ये ऊस पावसाच्या पाण्यावर पिकतो. आपल्याकडे सिंचनाच्या पाण्यातून ऊस पिकवला जातो. तिकडे जास्त शेती आणि आणपल्याकडे कमी शेती आहे. पण आपण त्यांची नक्कल केली आणि आपली फसगत झाली, असंही त्यांनी सांगितलं.
