Nana Patole: महाविकास आघाडीतील खदखद थेट हायकमांडकडे, नानांची सोनिया गांधींकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार

| Updated on: May 16, 2022 | 1:05 PM

Nana Patole: राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचं तीन दिवसांचं संकल्प शिबीर पार पडलं. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. नाना पटोलेही या शिबिराला उपस्थित होते.

Nana Patole: महाविकास आघाडीतील खदखद थेट हायकमांडकडे, नानांची सोनिया गांधींकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार
महाविकास आघाडीतील खदखद थेट हाकमांडकडे, नानांची सोनिया गांधींकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: राज्यातील महाविकास आघाडीतील खदखद थेट काँग्रेस हायकमांडच्या दरबारात गेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे (sonia gandhi) राष्ट्रवादी विरोधात तक्रार केली आहे. स्वत: नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने फोडाफोडी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत नेले. भिवंडीतही पक्ष फोडला. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने (ncp) भाजपसोबत संधान साधून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचं अजूनही भाजपसोबत संधान आहे. सरकारमध्ये असूनही राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अडचणीत आणलं जात आहे. त्याबाबतची तक्रार सोनिया गांधींकडे केली आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं. तसेच सोनिया गांधी यांनी ही तक्रार ऐकून घेतली आहे. येणाऱ्या काळात त्याचे परिणाम निश्चितच दिसून येतील, असा दावाही नानांनी केला आहे. नानांनी थेट राष्ट्रवादीची तक्रार सोनिया गांधींकडे केल्यानंतर आता राष्ट्रवादी त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचं तीन दिवसांचं संकल्प शिबीर पार पडलं. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. नाना पटोलेही या शिबिराला उपस्थित होते. आज नागपूरमध्ये आले असता पटोले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील पक्षांतर्गत निवडणुकांचे संकेत देत राज्यात फेरबदल होणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात पक्षांतर्गत निवडणूका सुरु झाल्या आहेत. राज्यात पक्ष संघटनेत बदल होणार आहे. प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात फेरबदल करणं हा हायकमांडचा निर्णय आहे, असं नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच भाजपला पर्याय

प्रशांत किशोर अलिकडे सांगतायत, आम्ही आधीपासूनंच सांगतोय भाजपला पर्याय काँग्रेसच आहे. हे ठामपणे सांगतोय. ज्या प्रमाणे कृत्रिम महागाई वाढायला लागलीय, त्यामुळे आता लोकांना काँग्रेसची आठवण यायला लागली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभा अध्यक्षपदाची निवड भाजप न्यायालयात गेल्यावर थांबली. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्षपादची निवड होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

राज ठाकरेंनी मशिदीत जावं

कुणाच्या पवित्र सणामध्ये व्यत्यय आणणे चुकीचं आहे. कुणी धर्माच्या आड येत असेल तर ते गुन्हेगार आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई व्हावी. राज ठाकरे यांनी मशिदीत जाऊन कोणत्या मशिदीवर भोंगा वाजतो हे पाहावं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंगे आहेत की नाही पाहावं. भोंग्याच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंबलबजावणी हीच काँग्रेसची भूमिका आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न, हे सहन करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

त्या वादात आम्हाला पडायचं नाही

केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी भोंग्यांचा मुद्दा पुढे आला आहे. बाबरी मशीद कुणी पाडलीय या वादात आम्ही जात नाही. आम्ही बांधणाऱ्यांमध्ये आहोत, असं सांगतानाच शरद पवार यांना सर्टीफीकेट देण्याचा कुणाला अधिकार नाही, त्या वादात आम्ही पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.