फलकावर साकारले ‘आधुनिक तुकाराम’; तुकाराम मुंढेंच्या कार्याला अनोखा सलाम
आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या कलाशिक्षकाने IAS तुकाराम मुंढे यांना 'आधुनिक तुकाराम' म्हणून फलकात साकारले आहे. संत तुकाराम महाराजांच्या विचारांशी साधर्म्य साधत, त्यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय कार्याला ही अनोखी मानवंदना आहे. भेसळविरोधी कारवाई, पारदर्शक कारभार यामुळे ते जनहिताचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. ही कलाकृती भक्ती आणि सामाजिक जबाबदारीचा संगम दर्शवते.

राज्यभरात आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा होताना दिसत आहे. विठ्ठलाच्या जयघोषात राज्य दुमदुमलं आहे. मंदिरांमध्ये भक्तभाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत असून देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक आतुर आहेत. दरम्यान आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नाशिक जिल्ह्यातील एका कलात्मक फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तथा वरिष्ठ आयएएस अधिकारी श्री. तुकाराम मुंढे यांना संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेशी जोडत ‘आधुनिक तुकाराम’ म्हणून साकारले आहे. या फलकाद्वारे त्यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय कार्याला अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आली आहे.
आषाढी एकादशी हा संत परंपरा, भक्ती, सत्य आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा पवित्र दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर श्री. देव हिरे यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांशी साधर्म्य असलेली मूल्ये—सत्यनिष्ठा, निःस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा आणि जनकल्याण—यांचे आधुनिक काळातील प्रतीक म्हणून श्री. तुकाराम मुंढे यांची प्रतिमा फलकावर प्रभावीपणे रेखाटली आहे.
श्री. तुकाराम मुंढे यांनी आपल्या संपूर्ण प्रशासकीय कारकिर्दीत नियमांची कठोर अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी भूमिका सातत्याने निभावली आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, निकृष्ट दर्जाची उत्पादने तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. त्यांच्या धाडसी निर्णयांमुळे आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता केलेल्या कारवाईमुळे ते राज्यभरात कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि निर्भीड अधिकारी म्हणून ओळखले जातात.
फलकावर विशेष संदेश
किती ही भेसळ झाली विठुराया, माणूसह साया विसरला. येऊ दे बा आता, असा ‘तुकाराम’ घामातला रामकळे ज्याला.. असं या फलकावरील संदेशात लिहून भावना व्यक्त करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राला अशाच कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि लोकहिताला वाहून घेतलेल्या अधिकाऱ्यांचे नेतृत्व लाभत राहावे, अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी व्यक्त करण्यात आली आहे.
या अनोख्या कलाकृतीमुळे आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात सामाजिक जबाबदारी, प्रामाणिक प्रशासन आणि लोकसेवेचा संदेशही प्रभावीपणे पोहोचला आहे. भक्ती आणि सामाजिक मूल्यांचा संगम घडवणाऱ्या या फलकाची परिसरात मोठी चर्चा होत असून, नागरिकांसह वारकरी आणि विविध स्तरातील नागरिकांकडून या कलात्मक उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले जात आहे.
