महायुतीचे दोन्हीही संकटमोचक मैदानात, पण बंडखोर उमेदवार ऐकेना; पडद्यामागून मोठी ऑफर
नाशिक विधान परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा! मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या शिष्टाईनंतरही बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; नरेंद्र दराडेंसमोरील अडचणी वाढल्या.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते मैदानात उतरले असतानाच आता राजकीय समीकरणांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे आता सध्या गोकुळ गीतेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या नाशिकच्या राजकारणात अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. बंडखोर गोकुळ गीते यांचे मन वळवण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. तसेच गोकुळ गीते यांनी उमेदवारी कायम ठेवून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंतीही करण्यात येत आहे. यासाठी महायुतीकडून पूर्ण ताकद पणाला लावली जात आहे.
भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे संकटमोचक मंत्री उदय सामंत हे स्वतः नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. याच पार्श्वभूमीवर आज गिरीश महाजन-उदय सामंत यांची चर्चा होणार होणार आहे. गोकुळ गीते यांनी उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली आहे. तर दुसरीकडे गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
गोकुळ गीते यांच्याकडून निवडणूक लढवण्याचा निर्धार
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फोनवरुन गोकुळ गीते व त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधून बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या मिनिटांपर्यंत प्रयत्न केले. वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर गोकुळ गीते यांचे बंधू आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला. मात्र, गोकुळ गीते हे दिवसभर नॉट रिचेबल राहिले आणि त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला. “ज्यांनी माझा बाप काढला, शिवीगाळ केली, त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही,” अशी अत्यंत आक्रमक भूमिका घेत गोकुळ गीते यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
महायुतीसमोर दुहेरी बंडखोरीचे आव्हान
नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी माघार न घेतल्यामुळे आता ही निवडणूक दुरंगी न होता त्रिकोणी होण्याची चिन्हे आहेत. महायुतीसमोर केवळ गोकुळ गीते यांचेच नव्हे, तर भाजपचे मालेगावचे नेते प्रसाद हिरे यांचेही आव्हान तांत्रिक कारणांमुळे कायम राहिले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, भाजपचे बंडखोर गोकुळ गीते आणि दुसरे बंडखोर प्रसाद हिरे अशा प्रमुख उमेदवारांमध्ये आता थेट लढत होणार असून, या दुहेरी बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी कमालीची वाढली आहे.
पुढील राजकीय डावपेच काय?
आता गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची दमछाक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत हे आज नाशिकमध्ये पुढील राजकीय डावपेचांबाबत आणि मतफुटी रोखण्याबाबत स्थानिक नेत्यांशी महत्त्वाची चर्चा करणार आहेत. या पडद्यामागील हालचालींनंतर नाशिक विधान परिषदेचे चित्र काय वळण घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
