रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी : छगन भुजबळ

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या व संभाव्य धोका लक्षात घेवून प्रत्येक नागरिकाचा लसीकरणाचा पहिला डोस प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य यंत्रणांनी लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी.

रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी : छगन भुजबळ
रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 10:22 PM

नाशिक : तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह ‘कवच-कुंडल’ मोहिमेत लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात यावी, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. आज येवला व निफाड तालुका कोरोना सद्यस्थिती व उपायोजना आढावा बैठक प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. (Campaign should be carried out to control the number of patients, Chhagan Bhujbal said)

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या व संभाव्य धोका लक्षात घेवून प्रत्येक नागरिकाचा लसीकरणाचा पहिला डोस प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य यंत्रणांनी लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी. तसेच याकरीता आवश्यकतेनुसार मनुष्यबळासाठी मानधन तत्वावर परिचारीका व आरोग्यकर्मी यांच्या सेवा मानधन तत्वावर घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लसीकरणाची वेळ वाढवण्याचे निर्देश

ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्याच्या दृष्टीने गावातील सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक यांच्याशी समन्वय साधून लसीकरणाच्या डेटा एंट्रीसाठी निश्चितच मदत मिळू शकते. त्याचप्रमाणे दिवसाला 8 हजार पर्यंत लसीकरण होण्यासाठी लसीकरणाची वेळ सुध्दा वाढवावी, असेही निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले. भुजबळ पुढे म्हणाले की, बाधित रूग्णांना गृहविलगीकरणात न ठेवता त्यांना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात यावे. तसेच वाढत्य संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कोविड रूग्णालयात रुग्णांना भेटीस येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी होणार नाही, यासाठी कडक निर्बंध करावेत, अशा सुचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.

अतिवृष्टीतील नुकसानीचा घेतला आढावा

या बैठकी दरम्यान येवला व निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचा आढावा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. बाधित शेतकरी, मृत जनावरे, पडझड झालेली घरे यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून त्याचा अहवाल जिल्हधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच पंचनामा करताना ड्रोन पध्दतीचा वापर प्रामुख्याने करावा, असेही त्यांनी यावेळी सुचित केले.

कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप

यावेळी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शोभा गणेश बडोदे, येवला, अफसाना इम्रान शेख, येवला, गंगाधर दगु पोळ, येवला, सुनिल रमेश गायकवाड, बाभुळगांव, अण्णसाहेब यादव झाल्टे, अंगुलगांव, देवराम शंकर माने, महालखेडा चां. यांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी रुपये 20 हजार धनादेशाचे वाटप पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. (Campaign should be carried out to control the number of patients, Chhagan Bhujbal said)

इतर बातम्या

अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको; भाजप नेते गिरीश महाजन यांचा सरकारवर हल्लाबोल

आई राजा उदो उदो: सप्तश्रृंगी गडावर भक्तांचा मेळा; दर्शनासाठी ‘या’ पाच ठिकाणी मिळतायत ऑनलाइन पास!