भारताच्या राजकारणात थ्री इडियटस, एक महाराष्ट्रात, दोन केंद्रात; संजय राऊत यांनी डिवचलं
संजय राऊत यांनी भारतीय राजकारणातील 'थ्री इडियट्स' संकल्पनेवर भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली. एक इडियट महाराष्ट्रात आणि दोन केंद्रात असल्याचा दावा त्यांनी केला. 'इडियट' शब्द असंसदीय नसल्याचे सांगत, त्यांनी भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शरद पवार इंडिया आघाडीसोबतच राहतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले, तसेच वंदे मातरम वादावर अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

इडियट हा काही असंसदीय शब्द नाही. या देशात थ्री इडियट हा सिनेमा आला होता. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. स्वत: पंतप्रधानांनी हा सिनेमा पाहायला सांगितलं होतं, असं सांगतानाच भारतीय राजकारणात थ्री इडियटस कोण आहेत हे तुमहाला चांगलं माहीत आहे. एक इडियट महाराष्ट्रात आहे. दोन केंद्रात आहेत, असा शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. नाशिकमध्ये उबाठा गटाचा मोर्चा आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
केंद्रीय मंत्रिमंडळात इडियट आहेत, असं तुम्ही काल म्हणाला होता. तुमच्या मते भारतीय राजकारणातील थ्री इडियटस कोण? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. हे लोक इडियटच आहे. इडिटयला इडिटच म्हटलं पाहिजे ना. अमित शाह म्हणतात माफी मागा. हे इडियटपणाचंच लक्षण आहे. ज्यांना वंदे मातरमचा इतिहासच माहीत नाही. वंदे मातरमचं ऊर्जा स्त्रोत काय आहे? कुठून आलं? अन् काँग्रेसला म्हणतात माफी मागा. तुम्ही आधी माफी मागा. तुम्ही संसदेतून पळून गेला. इडियट नाही का? मोदी पळून गेले. इडियट नाही का? रोज पेपर फुटत आहेत. मंत्री इकडे तिकडे फिरत आहेत. परवा लालकिल्ल्यावर टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. मोदींना भाषण जमलं नाही. कुणाला इडियट म्हणायचं तुम्ही? इडियट हा काही असंसदीय शब्द नाही. या देशात थ्री इडियट नावाचा सिनेमा आला. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मोदी म्हणाले, तो सिनेमा पाहा. भारताच्या राजकारणातील थ्री इडियटस कोण हे तुम्हाला माहीत आहे. एक इडियट महाराष्ट्रात आहे. दोन केंद्रात आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
पवार कुठेही जाणार नाहीत
आपण विरोधातच आहोत, कोणीही संभ्रमात राहू नये, जोमाने काम करा, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला तेव्हा मी एकट्यानेच सांगितलं शरद पवार कुठे जाणार नाहीत. ते आमच्यासोबत राहतील. शरद पवार हे इंडिया ब्लॉक आणि आघाडीचे नेते आहेत. ते कुठे जाणार नाहीत. त्यांच्या विषयी भाजपवाले संभ्रम निर्माण करत आहेत. आम्ही लढू आणि जिंकू, असं राऊत म्हणाले.
शाहांना इतिहास काय माहीत?
सोनिया गांधी यांनी वंदे मातरम मध्येच थांबवल्याच्या भाजपच्या आरोपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा भाजपचा नरेटिव्ह आहे. असं झालं नाही. या देशात वंदेमातरमला मान्यता काँग्रेसने दिली आहे. कलकत्याच्या काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसने त्यावेळी पहिल्यांदा वंदे मातरम म्हटलं. तेव्हा मुस्लिम व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होता. भाजपने इतिहास वाचावा. स्वातंत्र्य मिळत असताना रात्री 12 वाजता संसदेत नेहरूंच्या समोर आचार्य कृपलानी यांनी वंदे मातरम म्हटलं. अमित शाहा यांना काय माहित आहे? त्यांना इतिहास माहीत आहे का? ते व्यापारी लोक आहेत. त्यांनी शेअर मार्केटमध्ये जाऊन काम करावं, असा हल्लाच त्यांनी चढवला.