
Navi Mumbai Municipal Corporation Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाचा महोत्सव सुरु आहे. पण EVM मधील बिघाड आणि तो दुरुस्तीसाठी लागणारा कालावधीमुळे अनेक मतदार वैतागले आहेत. तर दुसरीकडे मतदार यादीतील घोळामुळे अनेकांना त्यांचे मतदान केंद्रच हुडकण्यात मोठा वेळ गेला. सर्वसामान्यांनाच याचा फटका बसला नाही तर राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे सुद्धा त्याला अपवाद ठरले नाही. त्यांना मतदान शोधताना मोठी कसरत करावी लागली. एका मतदार केंद्रावरून दुसर्या मतदान केंद्रावर फेऱ्या माराव्या लागल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी निवडणूक आयोगाला याचा जाब विचारला.
नेत्यालाच मतदानासाठी हेलपाटे
राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना कोपरखैरणे सेक्टरमध्ये मतदार केंद्र शोधताना संताप अनावर झाला. नाईक हे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोपरखैरणे सेक्टर 10 मधील सेंट मेरी शाळेत पोहचले. त्यावेळी त्यांना खोली क्रमांक 9 मध्ये मतदान असल्याचे प्रशासनाकडून त्यांना कळविण्यात आले. पण तिथे पोहचल्यावर 9 क्रमांकाची कोणतीही खोली नसल्याचे समोर आले. यामुळे नाईक समर्थक आणि कुटुंबियांचा गोंधळ उडाला. मंत्री गणेश नाईक हे यापूर्वी कोपरखैरणे शाळा क्रमांक 94 मध्ये मतदान करत असत. सेंट मेरी शाळेतील मतदार यादीत नाव न सापडल्याने नाईक पुन्हा जुन्या केंद्राकडे गेले. पण तिथेही त्यांचे मतदान नसल्याचे समोर आले. त्यांना पुन्हा सेंट मेरी शाळेत धाव घ्यावी लागली. इथं त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. भाजप नेत्याचंच नाव निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत कुठं दडलंय हे समोर येत नसल्याची चर्चा मतदान केंद्रावर रंगली.
नाईकांना आयोगाला घेतलं फैलावर
या तांत्रिक चुकीमुळे गणेश नाईक चांगलेच संतापले. नाहक या मतदान केंद्रावरून त्या मतदान केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत असल्याचा त्रागा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी या सर्व प्रकारावर त्यांची नाराजी व्यक्त केली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना फेलावर घेतलं. मंत्री महोदयच नाहीतर आजच्या मतदानावेळी राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीतील मतदारांना या सावळ्यागोंधळाचा चांगलाच फटका बसला. काही उमेदवारांनाही त्यांचे मतदान केंद्र बदलल्याचे ऐनवेळी कळलं, त्यामुळे त्यांची धांदल उडाली तर दुसरीकडे सर्वसामान्य मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
गणेश नाईकांचे मतदान केंद्र फरार
आज 29 महानगरपालिकेतील काही ठिकाणी EVM मधील बिघाड समोर आला. त्यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी एक तास वाट पाहावी लागली. तर बोटावरील मार्कर पेनची शाई सॅनिटायझरने पुसल्या जात असल्याच्या घटनाही समोर आल्या. मुंबईत एका ठिकाणी दुबार मतदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या सावळ्या गोंधळावर निवडणूक आयोगाला धु धु धुतले. दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी गणेश नाईकांचे मतदान केंद्रच फरार झाल्याचा टोला लगावला. काही दिवसांपूर्वी नाईकांनी शिंदेंचा घोडे, टांगा फरार करण्याचा दावा केला होता, याची आठवण ठाकरे यांनी करुन दिली.