स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं संकट येणार… 4 दिवस थांबा, मुंबईतही हाहा:कार माजेल; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सध्या देशावर आर्थिक संकट ओढावले असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाची झळ संपूर्ण जगाला पोहोचत आहे. अशातच एका बड्या नेत्याने पुढील चार दिवसांमध्ये मुंबईतही हाहा:कार माजेल असे म्हटले आहे.

सध्या देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. वाढती महागाई, संभाव्य आर्थिक संकट आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक सडकून टीका करताना दिसत आहेत. हे होणार हे १०० टक्के सत्य आहे, या देशावर स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठे संकट येणार आहे हे आम्ही सांगत होतो. पण हे सरकार गंभीर नाही कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला शेवटी धर्मावर जायचे आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाते नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे.
पत्रकरांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “हे होणार हे १०० टक्के सत्य आहे, या देशावर स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठे संकट येणार आहे हे आम्ही सांगत होतो. मनमोहनसिंग यांनी त्यावेळी झळ लागू दिले नाही. अजून ४ दिवसांनी मुंबईत सुद्धा हाहाःकार माजेल. हे सरकार गंभीर नाही कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला शेवटी धर्मावर जायचे आहे.”
देशात महागाईचा भडका उडालेला असताना सरकारकडे कोणताही ठोस उपाय नाही. काळाबाजार करणारे उघडपणे रांगेत उभे असताना सरकार त्यांना पकडत नाही. या सरकारला सामान्यांशी काहीही देणेघेणे नसून हे केवळ भांडवलदारांचे सरकार असल्याची जोरदार टीका करण्यात आली. तसेच, हे सरकार गंभीर नसून त्यांना माहिती आहे की आपले अपयश लपवण्यासाठी शेवटी त्यांना ‘हिंदू-मुस्लीम’ आणि धर्माच्याच मुद्द्यावर जायचे आहे, असा घणाघातही त्यांनी केला.
‘केवळ इन्स्टाग्रामवरून राजकारण होत नसते’
अजित पवार गटाचे नेते जय पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगण्यात आले. केवळ इन्स्टाग्रामवरून राजकारण होत नसते आणि आपण ते पाहतही नाही, असे ते म्हणाले. तसेच, ज्यांना साहित्यातील ‘स’ देखील माहिती नाही, ते काय बोलणार, असा वैयक्तिक चिमटाही काढण्यात आला. वाढती महागाई आणि सामान्य जनतेचे प्रश्न बाजूला सारून सरकार केवळ धार्मिक ध्रुवीकरण आणि स्वार्थाचे राजकारण करत असल्याचा स्पष्ट संदेश या प्रतिक्रियांमधून देण्यात आला आहे.
मंत्रिमंडळातील नेत्यांवर टीका
सध्याच्या मंत्रिमंडळातील नेत्यांवर घराणेशाहीचा थेट आरोप करत, मंत्रिमंडळातील सगळ्या लोकांनी आपल्या बायकांना कोणत्या ना कोणत्या पदावर बसवून दादागिरी सुरू करावी आणि सगळी पदे आपल्या बायका-मुलांना देऊन टाकावीत, असा उपरोधिक आणि संतापजनक टोला लगावण्यात आला. एका विशिष्ट प्रकरणाचा संदर्भ देत, ‘ते मुसलमान आहेत आणि ५० वर्षे ते त्या घरात राहिले आहेत,’ असे सांगत कारवाईतील दुजाभावाकडेही लक्ष वेधण्यात आले.
