Sanjay Raut : एलन मस्क अमेरिकेत ट्रम्प यांना जाब विचारतात, पण मोदी… संजय राऊत यांचा पुन्हा एकदा हल्लाबोल

सुप्रिया सुळे यांनी ऑपरेशन सिंधूरबाबत नरेंद्र मोदींचे कौतुक केले, तर संजय राऊत यांनी त्यावर तीव्र टीका केली. राऊत यांनी ऑपरेशन सिंधूरचे यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मोदी सरकारच्या दहशतवादविरोधी धोरणावर निशाणा साधला. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावरही टीका केली आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपाबाबत त्यांची भूमिका कमजोर असल्याचा आरोप केला.

Sanjay Raut : एलन मस्क अमेरिकेत ट्रम्प यांना जाब विचारतात, पण मोदी... संजय राऊत यांचा पुन्हा एकदा हल्लाबोल
संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 12, 2025 | 10:58 AM

ऑपरेशन सिंदूरचं महत्व पटवून देण्यासाठी परदेशात जे शिष्टमंडळ गेलं होतं, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेही होत्या. काल त्यांनी एका वृत्तपत्राल लेख लिहून भारताच्या अनेक पंतप्रधानांसोबत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुणांचही कौतुक केलं. दहशतवादी विरोधी लढ्यात मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यावरून संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, ते त्यांचं ( सुप्रिया सुळे) यांचं मत आहे, पण ते देशाचं मत असले असं मी मानत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणात हस्तक्षेप कसा काय करू शकतात? अमेरिकेत त्यांचा एक मंत्री असलेला एलन मस्क त्यांना जाब विचारतो,पण भारतात हस्तक्षेप केल्यावरही मोदी ट्रम्पला जाब विचारत नाहीत, हे एका कमजोर पंतप्रधानाचं लक्षण आहे, असं म्हणत राऊतांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले राऊत ?

सुप्रिया सुळे यांनी मोदींचं कौतुक केलं, पण ते त्यांचं मत आहे. देशाचं मत असेल मी मानत नाही. मुळात ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का हा लोकांच्या मनात संशय आहे. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना होती. पाकिस्तानचे चार तुकडे करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना होती. पाकिस्तान परत आयुष्यात उठणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही यासाठी ऑपरेशन सिंदूरची योजना होती. आणि आज त्याच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना अमेरिकेत आर्मी डेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आहे, हे कसलं लक्षण मानायचं? असा सवाल राऊतांनी विचारला.

हिंदुस्तानने पाकिस्तान विरोधात जो लढा उभारला होता, तो मी थांबवला, असं अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प 17 वेळा सांगतात. ऑपरेशन सिंदूरची भूमिका आहे, त्याला छेद देणारी भूमिका अमेरिका घेते. आणि आमचे मुत्सदी पंतप्रधान यावर एक शब्द काढत नाही यावर. हा या देशाचा अपमान आहे, अशी टीका राऊतांनी केली. ट्रम्प आपल्या सुरक्षेच्या बाबतीत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणात हस्तक्षेप कसा काय करू शकतात? अमेरिकेत, त्यांचा एक मंत्री असलेला एलन मस्क त्यांना जाब विचारतो, पण भारतात हस्तक्षेप केल्यावरही मोदी ट्रम्पला जाब विचारत नाहीत, हे एका कमजोर पंतप्रधानाचं लक्षण आहे अशी टीका राऊतांनी केली.

खोटं बोलण्यात नोबेल द्यायचा असेल तर…

खोटं बोलण्यात नोबेल पुरस्कार कुणाला द्यायचा असेल तर एकच नाव समोर येईल. ते म्हणजे नरेंद्र मोदींचं, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. 11 वर्ष आणि त्याआधी खोटं बोलून सत्तेत आले. त्यानंतर ते खोटं बोलून सत्तेत टिकून राहिले. काय मिळालं या देशाला?, जनतेला काय दिलं ? असा खड़ा सवाल त्यांनी विचारला. गरीब गरीब होत आहे, आणि श्रीमंत हे आणखी श्रीमंत होत आहेत. त्यातही फक्त 10 ते 12 लोकचं श्रीमंत होत आहेत. या देशात महागाई वाढत्ये, दहशतवाद वाढतोय. तिकडे चीन घुसत आहे. पाकिस्तान वाकड्या नजरेने पाहतोय. मग 11 वर्षात केलं तरी काय ? असा प्रश्न विचारत राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला.