अकोला : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरात तणावाचे वातावरण आहे. या शहरांतील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून संचारबंदी तसेच इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आलाय. आता अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये रविवारपर्यंत संचराबंदी वाढवण्यात आली आहे. तसेच या भागातील इंटरनेट सुविधा रविवारपर्यंत म्हणजेच 21 डिसेंबरपर्यंत बंदच राहील.
त्रिपुरा राज्यातील कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. येथे अमरावती, मालेगाव, नांदेडसारख्या शहरांत हिंसाचार, दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर संवेदनशील शहरात पोलिसांकडून संचारबंदी लागू केली गेली. 12 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील एका भागात दगडफेकीची घटना समोर आली होती. तेव्हापासून अकोटमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. आता हीच संचारबंदी 21 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी प्रशासनाने 13 व 14 नोव्हेंबर अशा दोन दिवसांसाठी 24 तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदीत वाढ केली होती. नंतर हीच संचारबंदी 19 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारपर्यंत वाढविण्यात आली. आता संचारबंदीत पुन्हा एकदा 21 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आलीय. या काळात शहरातील इंटरनेट सेवा बंदच असेल.
त्रिपुरा राज्यातील कथित घटनेनंतर महाराष्ट्रातील काही शहरांत तणावाचे वातवरण निर्माण झाले होते. 12 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात मुस्लीम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपने अमरवती बंदचे आवाहन केले होते. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यामुळे नंतर येते तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. त्यानंतर अमरावती शहरात इंटरनेट सुविधा बंद करावी लागली होती. नांदेड तसेच मालेगाव या शहरांतसुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
त्रिपुरातील कथित घटनेनंतर महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्येही तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. हिंसाचाराच्या घटनेला 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीचा आढावे घेत आज शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
इतर बातम्या :