भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला धुडकावून लावला, शिंदे गट किती जागा लढणार?; शिंदे गटाच्या बड्या नेत्याने आकडाच सांगितला

| Updated on: Mar 19, 2023 | 6:49 AM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युतीचा विधानसभा निवडणुकीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यानुसार भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे.

भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला धुडकावून लावला, शिंदे गट किती जागा लढणार?; शिंदे गटाच्या बड्या नेत्याने आकडाच सांगितला
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप विधानसभेच्या 240 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वाट्याला 48 जागा येणार आहेत. बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेने बावनकुळे यांनी जाहीर केलेला हा जागा वाटपाचा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार याचा आकडाच सांगितला आहे. त्यामुळे आता जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत जुंपणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

कोण नेता काय घोषणा करत असेल याला काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत झालेला युतीचा हा विषय आहे. आम्ही 130 ते 140 जागा लढवणार आहेत. आम्ही त्यापेक्षा कमी जागा लढणार नाही, असं सांगतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान चुकीचं असून त्याबद्दल त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज दिली पाहिजे, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आम्ही लाचार, भिकारी नाही

संजय गायकवाड यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर टीकाही केली. आमच्या मनगटात दम आहे. लाचार, भिकारी नाही. ते आम्ही येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ. आमची लायकी काय आहे येणाऱ्या विधासभेत कळेल. मात्र आता त्यांची काय लायकी आहे, हे कळून चुकले, अशी टीका गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

75 टक्के कमाई हरामाची

यावेळी त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. कर्मचाऱ्यांनी आमदार, खासदारांची आपली तुलना करू नये. आम्ही 30-40 वर्ष जनतेत राहून जनतेचे काम करून निवडून आलेलो असतो. पण हे शासकीय अधिकारी काय करतात? शेतकऱ्याला पॉयझनचा डबा घ्यायला भाग पाडतात. दोन दिवसाच्या कामाला सहा महिने लावतात एवढा माज या कर्मचाऱ्यांना असतो.

भरमसाठ पगार असतानाही हे असं होतं. आता मला सांगा कोणता कर्मचारी हा पगारावर अवलंबून आहे? यांची 75 टक्के कमाई हरामाची असते. 95 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरची हरामाची कमाई असते. गडगंज झाले. त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाहीत. इतकी कमाई त्यांनी केलेली आहे. इमानदारीने फक्त पाच टक्के कर्मचारी पगारावर आहेत. कार्यालयातील चपराशी सुद्धा साहेबांना भेटायचे शेतकऱ्याकडून पैसे मागतो, अशी टीका त्यांनी केली होती.

तुमची लायकी तर सिद्ध करा

कुठल्याही ऑफिसमध्ये लोक गेले की कर्मचाऱ्यांची नजर त्यांच्या खिशावरच असते. माझी तर विनंती आहे की, या कर्मचाऱ्यांनी शपथ घ्यावी की यांना जर पेन्शन पाहिजे असेल तर मी कुणाकडूनही एक रुपया घेणार नाही. सरकारचा पैसा खायचा. सरकारला लुटायचं. सरकारच्या योजना गडप करायच्या. लोकांना त्रास द्यायचा. शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आणि मोठ्याने सांगायचं की आम्हाला पेन्शन द्या. अरे तुम्ही आधी लायकी तर सिद्ध करा. आमदार, आमदार खासदारांनी सांगितलेलं काम हे लोक करत नाहीत. तर ग्रामीण भागातील जनतेची काम हे लोक काय करत असतील? असा सवाल त्यांनी केला.