
गणेश सोनोने/प्रतिनिधी: अकोल्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या घडामोडी समोर आल्या आहेत. तर महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठा राजकीय डाव साधला आहे. तर यात शिवसेना उबाठा गटाला अकोल्यात मोठा धक्का बसला असून, निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात (Akola Uddhav Thackeray Sena Setback) प्रवेश केला आहे. अकोला पाठोपाठ राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची उद्धव सेनेला भीती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौर्यावर होते. ते मुंबईत परतल्यापासून काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच अकोल्यात उद्धव सेनेला मोठा झटका बसला आहे.
चौघांनी धरली शिंदेसेनेची वाट
तर मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे या चार नगरसेवकांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला. शिवसेना नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात प्रवेश झाला. तर या सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीही शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे हा राजकीय धक्का आणखी मोठा मानला जातो. दरम्यान, मनोज पाटील हे प्रहारचे महानगर अध्यक्ष असून त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उबाठासोबत युतीत निवडणूक लढवली होती. तर या पक्षांतरानंतर अकोल्यातील भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची ताकद वाढली आहे. आता ही आघाडी स्वीकृत नगरसेवकांसह एकूण संख्या 53 वर पोहोचली आहे.
आता उद्धव सेनेचे दोनच नगरसेवक
शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला, असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. तर या सर्व घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, उबाठा गटात आता केवळ 2 नगरसेवक उरले आहेत. सहा नगरसेवकातील चार नगरसेवक शिंदे गटात गेल्याने उद्धव सेनेला मोठा झटका बसला आहे. आता दोन नगरसेवक तरी उद्धव सेनेत राहतील का, की तेही त्यांचा मार्ग निवडतील यावर चर्चा सुरू आहे.