अरे व्वा! नवरा नवरीकडून वऱ्हाडी मंडळींना 33 कोटी 60 लाख रुपयांची अनोखी भेट, संपुर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा वर्षाव
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात एका वराच्या कुटुंबीयांनी संपूर्ण गावाला 33.6 कोटी रुपयांची अनोखी भेट देऊन आपले लग्न अविस्मरणीय करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ही अशी कोणती अनोखी भेट आहे ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका अनोख्या लग्न सोहळ्याची चर्चा त्यासोबतच कौतूक केलं जातंय. कारण या लग्न सोहळ्यात नवरा-नवरीने आणि त्यांच्या कुटुंबाने संपूर्ण गावाला तसेच आलेल्या वऱ्हाड्यांना जे अनोखे गिफ्ट दिले आहे त्यामुळे भेटीची व्याख्याच बदलून टाकली आहे. कारण या गिफ्टची रक्कम थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 33.6 कोटींच्या घरात आहे. या अनोख्या भेटीची आता देशभरात चर्चा होत असून, यामुळे प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या बहादूरपुरा गावात हा आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. 20 मे रोजी सिद्धेश्वर पेठकर या वराचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. पारंपरिक विधी, एक भव्य बँड आणि आकर्षक रोषणाईने हा सोहळा दिमाखदार झाला होता. तर या पेठकर कुटुंबियांनी हा सोहळा केवळ स्वतःच्या आनंदापुरता मर्यादित ठेवायचा नव्हता. त्यांनी या सोहळ्याला सामाजिक जाणीव आणि जबाबदारीशी जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
33.6 कोटी रुपये किमतीची वऱ्हाडी मंडळींना दिलेले अनोखे गिफ्ट कोणतं आहे?
या लग्न सोहळ्यात वऱ्हाड्यांना ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून भरमसाट खर्च करण्याऐवजी पेठकर कुटुंबाने दूरदृष्टी दाखवली. त्यांनी बहादूरपुरा गावातील सर्व 3,465 रहिवाशांना प्रत्येकी 1 लाख रूपयांचे सामूहिक अपघात विमा कवच देण्यात आले आहे. संपूर्ण गावासाठी या सामूहिक पॉलिसीची एकूण विमा रक्कम तब्बल 33.6 कोटी आहे. पेठकर कुटुंबाने या अनोख्या भेटीचा हप्ता स्वतःच्या खिशातून भरला, ज्याचा थेट फायदा गावकऱ्यांना वर्षभर होणार आहे.
हा मोठा निर्णय का घेण्यात आला?
वराच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागात अनेकदा सर्पदंश, वीज पडणे किंवा शेतीची कामे करताना होणारे अपघात सर्रास घडतात. या अपघातांमुळे गरीब कुटुंबांना अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांना संरक्षक कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही योजना राबवण्यासाठी पेठकर कुटुंबाने ग्रामपंचायतीची मदत घेतली. गावातील अधिकृत मतदार यादी विमा कंपनीकडे सादर करण्यात आली, जेणेकरून प्रत्येक पात्र गावकऱ्याला कोणत्याही भेदभावाशिवाय, त्रासाशिवाय किंवा गुंतागुंतीच्या कागदपत्रांशिवाय थेट या विमा संरक्षण पॉलिसीमध्ये समाविष्ट करता येईल. लग्नात मिळालेल्या सुरक्षेच्या या प्रति-भेटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ग्रामीण भागात अशी कौतुकास्पद भेट देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.