यवतमाळच्या शाळेत पाकिस्तानी देशभक्ती गीत, डान्सही केला; थेट पोलिसात तक्रार दाखल!

यवतमाळच्या एका शाळेत पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर नृत्य करण्यात आल्याचा दावा केला जातोय. भाजपाच्या नेत्याने तशी पोलिसात तक्रार केली आहे. या प्रकरणी आता तपास सुरू झाला आहे.

यवतमाळच्या शाळेत पाकिस्तानी देशभक्ती गीत, डान्सही केला; थेट पोलिसात तक्रार दाखल!
pakistan song
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 08, 2026 | 4:35 PM

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन तसेच नृत्य सादरीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सारीकरणावर आक्षेप घेत भाजपाचे उमरखेडचे नेते गोपाळ कलाने यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. ‘ये मर्द ये मुजाहिद तेरी एल्गार क्या है’ असे या गाण्याचे नावअसून ते स्नेह संमेलनामध्ये गायले गेले तसेच त्यावर नृत्यही करण्यात आले आहे, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हे गाणे पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखले जाते.

या गाण्याचा इतिहास काय?

हे गाणे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध देशभक्तीपर गीतांपैकी एक आहे. हे प्रामुख्याने लष्करी स्फूर्तीगीत (Martial Anthem) म्हणून ओळखले जाते. हफीज जालंधरी यांनी हे गाणे लिहिलेले आहे. त्यांनीच पाकिस्तानचे राष्ट्रगीतदेखील लिहिलेले आहे. या गाण्याची निर्मिती १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात झाली. त्यावेळी पाकिस्तानमध्ये रेडिओवर हे गाणे सैनिकांचे आणि जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी सतत प्रसारित केले जात असे. ‘ऐ मर्द-ए-मुजाहिद’ याचा अर्थ “हे धर्मयोद्ध्या” असा होतो. यात सैनिकाला त्याच्या शक्तीची आणि कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.

भारतासोबतच्या संघर्षातील संदर्भ आणि पुरावे

हे गाणे भारतासोबतच्या युद्धांमध्ये एक ‘मानसिक अस्त्र’ म्हणून वापरले गेल्याचे अनेक पुरावे मिळतात. ‘रेडिओ पाकिस्तान’च्या संग्रहातील माहितीनुसार युद्ध सुरू होताच राष्ट्रात जोश भरण्यासाठी हे गाणे मुख्य साधन बनले होते. अनेक इतिहासकारांच्या मते हे गाणे युद्धाच्या काळात “युद्धाची हाक” म्हणून वापरले गेले. लष्करी तज्ज्ञ आणि ‘द फ्रायडे टाइम्स’ सारख्या नियतकालिकांनुसार, जेव्हा जेव्हा भारतासोबत तणाव वाढतो (उदा. १९९९ चे कारगिल युद्ध किंवा २०१९ चा बालाकोट प्रसंग), तेव्हा या गाण्याचे नवीन व्हर्जन प्रसिद्ध करून जनतेमध्ये युद्धासाठी पोषक वातावरण तयार केले जाते. दरम्यान, आता पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.