School Holiday : या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्टमुळे प्रशासनाचा तातडीचा निर्णय!
पावसाची स्थिती लक्षात घेता पालघर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Palghar District School Closed : सध्या पावसाने कोकण, मुंबई, उपगर परिसरात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मुंबई तसेच ठाणे, पनवेल, डोंबिवली, नवी मुंबई या भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस पावसाचे असेच तांडव कायम राहण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे कोणताही अनुचूत प्रकार घडू नये म्हणून त्या-त्या भागातील जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. असे असतानाच आता पालघर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच 2 जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुट्टीचा निर्णय
पावसाची स्थिती लक्षात घेता पालघर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाच्या जोर कायम असून हवामान विभागामार्फत उद्याही रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शाळांना 2 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना करण्यात आले आहेत.
मुंबई, उपनगरात काय स्थिती?
पालघर जिल्ह्याप्रमाणेच पुढच्या काही तासांसाठी मुंबई आणि उपनगर भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. काही ठिकाणी पावसाची रिमझिम चालू आहे. उपनगरातही काही ठिकाणी रस्ते पाण्याने भरले आहेत. मुंब्रा येथे तर काही रस्तेच जलमय झाल्याचे दिसले. या रस्त्यांवर वाहने पाण्यात बुडून गेली. हवामानाची ही स्थिती लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढच्या पाच ते सहा दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी तसेच उपनगरात असाच पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. या भागात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
