महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
NCP BJP Conflict PMC Pune: पुणे महानगरपालिकेत सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) निधी वाटपाचा वाद कमालीचा चिघळला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महापालिकेत राष्ट्रवादीला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप केला असून, विकासनिधी

NCP BJP Conflict PMC Pune : पुण्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून यापूर्वी भाजपाचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांची उपमुख्यमंत्री सुनेक्षा पवार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. याची एक प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पाठवण्यात आली होती. आता सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्यामुळे, महापालिकेतील हा अंतर्गत वाद अधिक चव्हाट्यावर आला आहे.
पुणे महापालिकेत सत्ताधारी महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत मतभेद आणि निधी वाटपाचा वाद कमालीचा चिघळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महापालिकेत राष्ट्रवादीला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे आणि निधी वाटपात न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
सुनील टिंगरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र आणि गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आणि प्रभागांवर अन्याय केला जात असल्याचे म्हटले आहे. महापालिकेत सत्तेत एकत्र असतानाही भाजपच्या नेतृत्वाखालील स्थायी समितीकडून राष्ट्रवादीच्या प्रभागांमधील मंजूर विकासनिधी सूडबुद्धीने रोखला जात किंवा अन्य प्रभागात वळवला जात असल्याचा टिंगरे यांचा आरोप आहे. “हा करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपमान असून, राजकीय मतभेदांमुळे नागरिकांना विकासापासून वंचित ठेवू नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी करून न्याय मिळवून द्यावा,” अशी आग्रही मागणी टिंगरे यांनी केली आहे.
भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र या वादाची पार्श्वभूमी अशी आहे की, काही दिवसांपूर्वी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून तक्रार दाखल केली होती. या पत्रात बिडकरांनी आरोप केला होता की, महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पुरेशा प्रमाणात निधी आणि सभागृहात बोलण्याची जास्त संधी मिळत असतानाही, त्यांचे काही नगरसेवक (विशेषतः अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि सरकारी उपक्रमांवर सातत्याने चिखलफेक करत आहेत. बालवडकर यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकासकामांच्या ऑडिटची मागणी केल्याने भाजपचे नेते कमालीचे संतप्त झाले आहेत.
12 कोटी रुपयांचा निधी वळवल्याने संघर्षात भर या अंतर्गत धुसफुशीचा परिणाम म्हणून, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे (प्रभाग २-डी) आणि अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील तब्बल 12 कोटी रुपयांचा विकासनिधी अर्थसंकल्पातून काढून घेत तो भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वळवण्यात आला. या निर्णयाला राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला असून, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मुख्य इमारतीत धरणे आंदोलनही करण्यात आले होते.
राज्यात महायुतीचे सरकार एकदिलाने काम करत असताना, पुणे महापालिकेत मात्र “मैत्री राज्यात, पुण्यात नाही” अशी भूमिका भाजपने घेतल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहे.
